सातारा : ‘जनाधार असता तर खासदार उदयनराजेंच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चात अवघी शंभर माणसे आली नसती. सामाजिक प्रश्नांसाठी घेतलेल्या मोर्चामधील लक्षणीय उपस्थितीवरून जनता कोणाच्या पाठीशी आहे, हेच सिद्ध होते,’ असे मत ‘मनसे’चे राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांनी व्यक्त केले आहे.मुरलीधर भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकांना उत्तर देताना संदीप मोझर यांनी ही टीका केली आहे. मोझर यांनी पुढे म्हटले आहे की, गंभीर गुन्ह्यातील अटक टाळण्यासाठी फरारी झालेल्या उदयनराजेंसाठी रजताद्री हॉटेल ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान ३०० मीटर अंतरासाठी निघालेल्या मोर्चात कोणीही सर्वसामान्य व्यक्ती नव्हत्या. उदयनराजेंचे आजी-माजी नगरसेवक आणि त्यांच्या आघाडीचेच पदाधिकारी होते. यावरूनच त्यांच्या पाठीशी किती जनाधार आहे, हे स्पष्ट होत आहे. याउलट पहिल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेतलेल्या हजेरीमाळ व झेडपी मैदानावरील गर्दीशी तुलना करता हा अगदीच ‘पुअर शो’ होता. मोझर यांनी पुढे म्हटले आहे की, ‘एकाच मुद्द्यावर दोन-दोन वेळा मोर्चा काढूनही तुम्ही कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकणार नाही. झेडपी मैदान आणि हजेरीमाळावरील प्रचंड उपस्थितीची सभा हा संदीप मोझरांच्याच संघटन कौशल्य व नियोजनाचा करिष्मा होता. त्यावेळची ती गर्दी पाहून शरद पवार, लक्ष्मणराव तात्यांनाही राष्ट्रवादीच्या सभेत इतक्या संख्येने भगवे झेंडे कसे?, अशी विचारणा केल्यावर त्यांनीही ही मोझर यांच्या प्रतिष्ठानची किमया असल्याचे सांगितले होते आणि त्यातूनच उदयनराजेंच्या खासदारकीचा पाया रचला गेला. मात्र, त्यांना या उपकाराची काडीमात्रही जाणीव नाही.वाई तालुक्यातील धोम परिसरातील न्हाळेवाडी या आमच्या गावाला व भागाला त्याग केल्यानेच त्यागाची परंपरा आहे. धरणाच्या उभारणीसाठी आम्ही आमची घरे-दारे, जमीन जुमला, शेतीवाडीचा त्याग केला आणि पुर्नवसित झालो. जमिनी दिल्यानेच शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस आले आहेत. आमच्या वडिलांनी घेतलेल्या बाबर कॉलनीतील भाड्याच्या घरात आम्ही राहिलो. मात्र, आमच्या चाळीत राहण्यावर टीका करताना या चाळकऱ्यांनीच तुम्हाला भरभरून मते दिल्याचा मात्र तुम्हास विसर पडला ही कृतघ्नता आहे.मी कारागृहात असताना आणि स्वत:चे मत द्यायचा अधिकार नसताना प्रचारासाठी बाहेर जाण्याची संधी नसतानाही मला १८,६०० मते मिळाली आणि उदयनराजेंना मात्र एका-एका मतासाठी घरोघरी करोडो रुपये वाटत फिरावे लागले. आता २०१९ च्या निवडणुकीत माझ्यासमोर उभे राहा. घोडे मैदान लांब नाही, असे आव्हान देत उगाच खालच्या फळीतील कार्यकर्त्याला गुंतवून त्यांच्या तोंडून बेताल विधाने करण्यापेक्षा स्वत:ला पोलिसात हजर राहा व न्यायव्यवस्था व संविधानाचा आदर करा. (प्रतिनिधी)अपक्ष उभे राहण्यास हिंमत हवी..‘उदयनराजेंवर त्यांच्या सध्याच्या पक्षाचा विश्वास राहिलेला नाही. कमळ त्यांना जवळ करीत नाही. हाताने केव्हाच ‘टाटा बाय-बाय’ केलाय. शिवसेनेचे त्यांचे जमणे शक्यच नाही. त्यांचे गुण-अवगुण रिपब्लिकन आणि डाव्या आघाड्यांनाही चांगलेच माहीत आहेत. अपक्ष उभे राहण्यासाठी हिंमत असावी लागते. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत कोणत्या पक्षातून उमेदवारी मिळणार इथपासून त्यांची सुरुवात आहे. अर्थात त्यांचा पाडाव करण्यासाठी आमचे ‘रेल्वे इंजिन’च धडाडणार असून, या क्रांतीभूमीत आम्हीच परिवर्तन घडवू,’ अशी टीकाही संदीप मोझर यांनी पत्रकात केली असून, पत्रकाऐवजी ठोस कृती करण्याचे आवाहनही केले आहे.
उदयनराजे समर्थकांचा पुअर शो
By admin | Updated: May 5, 2017 00:25 IST