वाठार स्टेशन : जिल्ह्यात यंदा किसन वीर उद्योग समूहाचा प्रतापगड कारखाना वगळता पंधरा कारखान्यांचे गाळप सध्या वेगाने सुरू आहे. यातून आजअखेर जिल्ह्यात ६९ लाख १३ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन ७५ लाख ४ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
जिल्ह्यात मागील वर्ष सोडता सलग दोन वर्षांत शंभर लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. या तुलनेत यंदाही साखर उत्पादनात मोठी वाढ होणार आहे. या वर्षीही शंभर लाख क्विंटल साखरेच्या उत्पादनाचा टप्पा सहज पार होईल, अशी परस्थिती आहे. एका बाजूने साखर उत्पादन वाढत असताना दुसऱ्या बाजूने मात्र शेतकऱ्याला ऊस दर देण्याबाबतीत अनेक कारखाने उदासीन आहेत. एकरकमी एफआरपी दर देण्याची मानसिकता अनेक कारखानदारांची दिसत नाही. दोन ते तीन टप्प्यांत एफआरपी देण्यासाठी कारखान्यांनी शेतकऱ्यांना बांधून घेतले आहे. शरयू कारखान्याने तर एफआरपीला कोलदांडा लावत अवघ्या २ हजार १०० रुपयांचे पेमेंट दोन महिन्यांनंतर देत शेतकऱ्यांना फसवण्याचा उद्योग सुरू केला आहे. त्यामुळे या कारखान्याबाबत शेतकरी उदासीन आहेत.
जिल्ह्यात १८ फेब्रुवारीअखेर फलटण तालुक्यातील श्रीराम जवाहर कारखान्याने ३ लाख ४३ हजार ६३२ मेट्रिक टन गाळप करीत ४ लाख ९७ हजार ४०० लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. न्यू फलटण साखरवाडीने ३ लाख ३८ हजार ८९५ मेट्रिक टन गाळप करीत ३ लाख ९७ हजार ६४० लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. शरयू शुगरने ६ लाख ४ हजार ६ मेट्रिक टन उसाचे गाळप करीत ५ लाख ७१ हजार ४५० लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे.
स्वराज इंडिया फलटणने ५ लाख ३४ हजार ९०५ मेट्रिक टन गाळप करीत ४ लाख ३१ हजार २७५ लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर शुगरने जिल्ह्यात सर्वात जास्त गाळप केले. यात ९ लाख ५९ हजार १२० मेट्रिक टन गाळप करीत १० लाख २९ हजार ८५० लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे.
माण-खटाव तालुक्यातील ग्रीन पॉवर शुगर ३ लाख ९७ हजार २८० मेट्रिक टन गाळप करीत ४ लाख ४२ हजार ६०० लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. खटाव-माण कारखान्याने ४ लाख ५५ हजार ३१० मेट्रिक टन गाळप करीत ४ लाख ८३ हजार २६० लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. जयवंत शुगर कऱ्हाडने ४ लाख ५७ हजार ०७० मेट्रिक टन गाळप करीत ४ लाख ८८ हजार २५० लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. कऱ्हाड तालुक्यातील कृष्णा कऱ्हाडने ७ लाख ९८ हजार ५६० मेट्रिक टन गाळप करीत ९ लाख ५२ हजार १४० लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. सह्याद्री कऱ्हाडने ७ लाख ८३ हजार ५०० मेट्रिक टन गाळप करीत ९ लाख ६६ हजार ४५० लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे.
रयत कऱ्हाड कारखान्याने ३ लाख ५५ हजार ४२० मेट्रिक टन गाळप करीत ४ लाख २२ हजार २७० लाख क्विंटल साखर उत्पादित केली. लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याने १ लाख ५८ हजार ८७५ मेट्रिक टन उसाचे गाळप करीत १ लाख ८८ हजार ४०० लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. अजिंक्यतारा साखर कारखान्याने ४ लाख ३५ हजार ३५० मेट्रिक टन गाळप करीत ४ लाख ९० हजार ६३० लाख मेट्रिक टन उत्पादित केली आहे. किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना भुईजने २ लाख ८० हजार १२० मे टन गाळप करीत २ लाख ३९ हजार ८६० लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. नुकताच किसन वीर कारखान्याचा खंडाळा कारखाना सुरू करण्यात आला असून, या कारखान्याने ११ हजार १९० मेट्रिक टन गाळप करीत २ हजार ७०० क्विंटल साखर उत्पादन केले आहे. यंदा मागील वर्षीची एफआरपी न दिल्याबद्दल प्रतापगड कारखाना बंद आहे.