नवनाथ जगदाळे --दहिवडी --लोणंद ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्याने आता दहिवडीलाही लवकरच नगरपंचायत दर्जा मिळणार आहे. दहिवडीला नगरंपचायत झाल्यानंतर अनेक सुविधा मिळणार, अशी चर्चा होत असल्याने ‘नगरपंचायत म्हणजे काय रे भाऊ?,’ असा प्रतिप्रश्न लोकांमधून विचारला जात आहे. त्यातच नगरंपचायत होण्याने दोन्ही काकांकडील सत्ता कदाचित नवीन पिढीकडे जाऊ शकते. सातारा जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त होणार आहे. त्यापैकी लोणंद नगरपंचायत झाल्याने त्या पाठोपाठ आता दहिवडीलाही नगरपंचायत होणार, हे जवळपास निश्चित आहे. फक्त ती कधी होणार एवढाच प्रश्न राहणार आहे. दहिवडी नगरपंचायतीची सर्व प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाल्याने औपचारिक घोषणाच बाकी राहिली आहे. त्यामुळे याची उत्सुकता लागून राहिली आहे. दहिवडी नगरपंचायत होताच अनेक राजकीय संदर्भ बदलणार आहेत. पूर्वीपासून वॉर्डरचना दहिवडीला अस्तित्त्वात होती. ६ वॉर्डमधून १७ उमेदवार निवडून जात होते. त्यापैकी भवानवाडी वॉर्ड वाड्या -वस्त्या तर तुपेवाडी व विठोबा वॉर्ड, काही प्रमाणात गांधी वॉर्डाची रचना शहर व वाड्या-वस्त्या असा होता. तर श्रीराम वॉर्ड व सिद्धनाथ वॉर्ड दहिवडी मुख्य शहरात होता. त्यामुळे ग्रामपंचायतीला प्रतिनिधी निवडून देताना लोकांच्या अंगवळणी पडले होते. आता नवीन अध्यादेशानुसार प्रभाग पद्धत झाल्यास काही ठिकाणी उमेदवार देताना, प्रतिनिधी निवडून देताना कसरत करावी लागणार आहे. भटकीमळा, भवानवाडी, डबरमळा, तुपेवाडी, शिंदेमळा, कटपाळेमळा या वाड्या-वस्त्यांना स्वत:च्या उमेदवाराला मतदान करता येत होते; परंतु प्रभाग रचनेमुळे प्रत्येक वाड्या-वस्त्यांवरील उमेदवार एकमेकांविरुद्ध लढणार असल्याने लोकांना राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्या स्मिता वायदंडे व पंचायत समिती सदस्य व विद्यमान उपसभापती अतुल जाधव यांच्यानंतर दहिवडी हे गाव पूर्णत: वगळले जाणार असल्याने त्यांची ही शेवटची टर्म असणार आहे. नवीन प्रभाग रचनेमुळे ग्रामपंचायतीच्या सुरुवातीच्या काळापासून राहिलेली दोन्ही काकांकडील सत्ता हळूहळू नवीन पिढीकडे सरकणार आहे. प्रभाग रचनेमुळे प्रत्येकाच्या वैयक्तिक कामावर मतदान होणार असल्याने नेत्यांचे अस्तित्त्व कमी होऊन बंडोबाचे पेव फुटणार आहे. नगरपंचायत झाल्याने दहिवडी गावाला मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होणार आहे. दहिवडी शहराचा विकास होणार आहे.पायाभूत सुविधा मिळणार...दहिवडी शहराची लोकसंख्या १७ हजारांच्या वर आहे. तालुक्याचे ठिकाण असल्याने सर्वच शासकीय मुख्यालये दहिवडीला असल्याने लोकांची येथे नेहमीच वर्दळ असते. अशावेळी त्यांना पायाभूत सुविधा देताना ग्रामपंचायतीवरही ताण येत असतो. नगरंपचायतीमुळे मोठ्या प्रमाणात निधी मिळत असल्याने उत्पन्न वाढणार आहे. निधी मिळाल्याने पायाभूत सुविधा पुरविण्यास मदत होणार आहे. तर नुकताच लोंणदला नगरंपचायतीचा दर्जा मिळाल्याने आता नंबर दहिवडीचाच अशी चर्चा होत आहे.
दोन्ही काकांकडील सत्ता नव्या पिढीकडे!
By admin | Updated: November 24, 2015 00:27 IST