सातारा : ‘उदयसिंह पाटील आणि सल्या चेप्या यांच्यात होणारे संभाषण टेप केले; परंतु संशयास्पद अथवा अक्षेपार्ह काहीच सापडले नाही,’ अशी माहिती तपासी अधिकारी संभाजी पाटील यांनी उलटतपासात दिली.संभाजी पाटील म्हणाले, ‘घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी कऱ्हाड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये आमदार शशिकांत शिंदे, अतुल भोसले, आनंदराव पाटील यांच्यासह अन्य काहीजण सहभागी झाले होते. आरोपींना आणि या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक करावी, यासाठी हा मोर्चा होता. तत्कालीन केंद्रीय मंत्री व आताचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष आनंदराव पाटील हे संजय पाटील यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी आले होते. मात्र, त्याची तारीख मला आठवत नाही.आरोपींचे फोन नंबर कॉल डिटेल्स रेकॉर्ड तपासणीसाठी पाठविले होते. मात्र, ते नंबर कोणाचे होते, हे माहिती नव्हते. दोषारोपत्र न्यायालयात सादर केल्यानंतर त्यामध्ये उदयसिंह पाटीलचा फोन नंबर होता, असे मला समजले. यासंदर्भात तपास सुरू होता. बाजार समितीच्या निवडणुकीच्या दिवशीची सीडीआर रिपोर्टची तपासणी सुरू होती. आरोपीकडून जप्त केलेली हत्यारे एकाच जागेवर सापडली. (प्रतिनिधी)
फोन ‘टॅपिंग’मध्ये आक्षेपार्ह काही मिळाले नाही
By admin | Updated: August 27, 2014 23:29 IST