शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

माणसं मरताहेत... मंत्री, खासदार, आमदार कुठे बसलेत ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:40 IST

सातारा : जिल्ह्यात गेल्या आठ दिवसात दोनशे जणांनी मृत्यूला कवटाळले. दहा हजारजण बाधित झाले. अगदी ३४ वर्षांच्या तरुणाचाही कोरोनाने ...

सातारा : जिल्ह्यात गेल्या आठ दिवसात दोनशे जणांनी मृत्यूला कवटाळले. दहा हजारजण बाधित झाले. अगदी ३४ वर्षांच्या तरुणाचाही कोरोनाने घात केला. तरीही अजून सातारा जिल्ह्याबाबत सरकार जागे होत नाही. माणसं मरत असताना केवळ बैठका आणि लाल दिव्याच्या गाड्या फिरवून प्रश्न सुटणार नाही. आता पाठीवर हात बांधून फिरण्याचे दिवस गेले. दिवस-रात्र एक करून रुग्णांसाठी व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. कोणाला काय पाहिजे, काय अडचणी आहेत याची विचारपूस करणे गरजेचे आहे. फोनवरही सध्या नेते सापडत नाहीत. त्यामुळे ते नेमके कुठे जाऊन बसलेत, अशी विचारणा जनता करू लागली आहे.

आमच्या जिल्ह्याची पुण्याई म्हणून दोन मंत्री, तीन खासदार आणि ९ आमदार मिळाले आहेत. पण, एखाद्‌दुसरा सोडला, तर कोण कुठे आणि कोणासाठी काम करताहेत याचा पत्ताच नाही. कोणाचा वचक नाही ना कसली शिस्त. फक्त लाल दिव्याच्या गाड्या फिरवून लोक घाबरत नाहीत. कामाचाही तेवढाच उरक लागतो. मंत्री म्हणून गल्लीपासून दिल्लीपर्यंत यंत्रणा कधी हललेली दिसली नाही. सामाजिक प्रश्नांवरून जिल्ह्याची सभा गाजली नाही. काम होत नाही म्हणून प्रशासनाला धारेवर धरलेले नाही. सबकुछ अच्छा चल रहा है... मग लोक का मरताहेत... हा प्रश्न पडतो. एकदा दवाखान्याच्या बाहेर फिरून या... कार्यकर्त्यांच्या वेदना समजून घ्या... तुमच्या मदतीने उभा राहिलेला कार्यकर्ता आणि तुम्ही पाठ फिरविल्यामुळे खचलेला कुटुंबप्रमुख, दोघांकडेही बघा... नक्कीच काहीतरी करण्याची ऊर्मी तुमच्यामध्ये जागी होईल.

राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आपल्याकडे बाधित होण्याचे आणि मृत्यू होण्याचे प्रमाण कमी-अधिक आहे, असे आकडेवारीत सांगणारे अधिकारी किती दिवस आकड्यांमध्येच गुंतून पडणार आहेत? जिल्ह्यात बेड मिळत नाहीत. म्हणून लोकांचे जीव जातात. सकाळपासून रात्रीपर्यंत प्रत्येक हॉस्पिटलशी संपर्क साधून बेडसाठी जीव मेटाकुटीला येतो. तरीही बेड उपलब्ध होत नाही आणि होम आयसोलेशनमध्ये असलेल्यांना कोण विचारत नाही, अशी स्थिती सध्या साताऱ्यात पाहायला मिळत आहे.

चौकट

कसली ही उदासीनता

केवळ लोकांबाबत आपुलकी आहेत? असे दाखवून चालणार नाही. रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करून भागणार नाही, तर लोक का बाधित होताहेत याचाही तपास करावा लागेल. एवढी संख्या वाढण्याचे कारण काय, याचा कधी लोकप्रतिनिधींनी विचार केला आहे? त्याचे उत्तर मिळाले असेल तर त्यावर काय उपाययोजना केल्या आहेत? त्यामुळे संख्या कमी होण्यास मदत झाली का नसेल, तर तो उपाय योजण्यात असलेल्या अडचणींवर कशाप्रकारे मात करता येईल, यासाठी काही विचार केला आहे? का असे काहीच होत नाही? लोकप्रतिनिधींनी प्रशासनाच्या नावावर खापर फोडायचे आणि प्रशासनाने, कायदे करणारे तर लोकप्रतिनिधी आहेत, आम्ही फक्त अंमलबजावणी करणारे असे सांगायचे. याला काय म्हणायचे. एवढी उदासीनता आपल्यामध्ये आली आहे? का...

चौकट

लॉकडाऊनसाठीही उशीर होतोय

लॉकडाऊन करायचा किंवा नाही याबाबत निर्णय घेण्यासाठी उशीर होत आहे. नेमके काय करायचे हेच कळत नाही. अधिकारी आणि लोकप्रतिनिधी एकत्र येऊन का निर्णय घेत नाहीत. प्रत्येकाचा इगो आड येतो. कोण मोठा, कोण छोटा असा अहंभाव तयार होतो. त्याने बोलविलेल्या मिटिंगला मी कशाला जायचे, हा मुद्दा निर्माण करून वेगळा सुभा मांडला जातो. असे होता कामा नये. ठाम निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. त्याला उशीर करून काहीच उपयोग होणार नाही. माणसे मरत असताना निर्णय घेण्यासाठी दहा ते बारा दिवसांचा वेळ लागणे, हे कशाचे धोतक आहे? असे निर्णय राज्यकर्त्यांनी घेतले तर असून नसून काय उपयोग.

चौकट

लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात केले, आता का मागे

काही लोकप्रतिनिधींनी लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात कोरोना रुग्णांसाठी हॉस्पिटल उभारली. आपल्या जागा दिल्या. खिशातला पैसा खर्च केला. पण, आता का मागे पडताय. दुसऱ्या टप्प्यातही कोरोनामुळे मरणारांची संख्या वाढतेय. त्यांच्या मदतीलाही तुम्हाला जावेच लागेल. त्यामुळे उठा, जागे व्हा आणि मदतीला जा... आता मागे राहू नका.