सातारा : विविध मागण्यांसाठी राज्यातील ग्रामसेवकांनी काम बंद आंदोलन पुकारले असून ‘ग्रामसेवक संघटना झिंदाबाद’ म्हणत जिल्ह्यातीलही सुमारे ९०० ग्रामसेवक आंदोलनात सहभागी झाले आहेत. ग्रामसेवकांनी दफ्तर कपाटात ठेवून चाव्या गटविकास अधिकाऱ्यांकडे जमा केल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील जवळपास १४५२ ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प झाला आहे.ग्रामसेवक हा ग्रामपंचायतींचा कणा असून, ग्रामपंचायतीमार्फत योजना राबवायच्या असतील तर ग्रामसेवकांशिवाय पर्याय नसतो. त्याचबरोबर विविध दाखल्यांसाठीही ग्रामसेवकांची आवश्यकता भासते. एकप्रकारे ग्रामसेवक हा शासन आणि जनता यामधील दुवाच समजण्यात येतो. पण, सध्या राज्यातील ग्रामसेवकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. मागील आठ दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. ग्रामविकास अधिकाऱ्यांना स्वतंत्र वेतनश्रेणी देण्यात यावी, २० ग्रामपंचायतींच्या पाठीमागे एक विस्तार अधिकार देण्यात यावा, प्रवासभत्ता ११०० वरून ३ हजार रुपये करण्यात यावा, नवीन ग्रामसेवकांना पेन्शन योजना लागू करण्यात यावी, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे.जिल्ह्यातही या आंदोलनात सुमारे ९०० ग्रामसेवक सहभागी झाले आहेत. यामुळे जवळपास १४५२ ग्रामपंचायतीतील कामकाज ठप्प झाले आहे. लोकांना दाखले, उतारे मिळणे अवघड झाले आहे. शाळाप्रवेश व इतर कामांसाठी ग्रामसेवकांचे दाखले आवश्यक ठरले आहेत. त्यामुळे ग्रामसेवकांचा संप लवकरात लवकर संपण्याची प्रतीक्षा लोकांना लागली आहे. (प्रतिनिधी)
दफ्तर कपाटात; चाव्या बीडीआेंकडे!
By admin | Updated: July 13, 2014 22:52 IST