सातारा : आनेवाडी येथे सध्या असलेला टोलनाका १० लेन असून महार्गावरील वाहनांची वाढती संख्या पाहता टोलनाक्यावर वसुलीसाठी वेळ लागत असल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. याचा विचार करून महामार्ग प्राधिकरणाने याठिकाणी नवीन आठ लेन असणार टोलनाका उभारणीस प्रारंभ केला आहे. यामुळे टोलनाक्यावर मिनिटाला एक गाडी सुटणार आहे. आनेवाडी टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्यानंतर होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सध्याच्या टोलनाक्यापासून ३०० मीटर अंतरावर आणखी एक टोलनाका उभारण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.शनिवार, रविवार आणि इतर सुटीच्या दिवशी एकाच दिवशी हजारो वाहने रस्त्यावर उतरल्याने बहुतांश ठिकाणच्या टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा लागतात. त्या रांगा वाढत जाऊन त्याचे रूपांतर वाहतुकीच्या कोंडीत होत असते. त्यामुळे वाहनचालक, प्रवाशांना प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. यावर उपाय म्हणून दोन वर्षांपूर्वी महामार्ग प्राधिकरणाने आनेवाडी टोलनाक्यापासून तीनशे मीटर अंतरावर आणखी एक टोलनाका उभारण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला होता. त्याला मंजुरी मिळाली असून टोलनाका उभारणी अंतिम टप्प्यात आली आहे.नवीन टोलनाक्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पूर्वीच्या १० आणि नव्याने होणाऱ्या ८ लेनच्या माध्यमातून टोलवसुली गतीने होणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवणार नाही. (प्रतिनिधी)दिवसाला सुमारे २७ हजार वाहनांची ये-जाआनेवाडी टोलनाक्यावरून दिवसाला सरसरी २७ हजार वाहनांची ये-जा होते. मात्र, सण, उत्सवाच्या काळात, सलग सुटीच्या दिवशी वाहतुकीत वाढ होऊन ती ४० ते ४५ हजारांवर पोहोचते. अशावेळी कोंडीची समस्या उद्भवते. यावर उपाय म्हणून दुसऱ्या नवीन टोलनाक्याचे काम सुरू केले आहे. दोन नाक्यांमुळे आता मिनिटाला एक गाडी टोल भरून मार्गस्थ होऊ शकणार आहे, अशी माहिती आनेवाडी व्यवस्थापकीय विभागाचे विवेक शर्मा यांनी दिली. सातारा-पुणे वाहतुकीसाठी स्वतंत्र वसुलीआता आनेवाडी येथे दोन टोलनाके होणार असून एका टोलनाक्यावर साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी तर दुसऱ्या टोलनाक्यावर पुण्याकडे जाणाऱ्या वाहनासांठी टोल आकारणी केली जाणार आहे. त्यामुळे वेळ वाचण्याबरोबरच कोंडीची समस्याही मिटणार आहे.
नवीन टोलनाक्यावर मिनिटाला एक गाडी सुटणार...
By admin | Updated: December 2, 2015 00:40 IST