सातारा : सातारची ओळख असणारे कंदी पेढे घेऊन वैभव जाधव विमानाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेला. विमान प्रवासात भीती तर वाटली नाही ना? असा अस्खलित मराठीतला त्यांनी उच्चारलेला प्रश्न ऐकून छोट्या वैभवसह त्याचे सोबती भारावून गेले. ‘लोकमत’तर्फे आयोजित केलेल्या ‘हवाई सफर’ योजनेचा मान मिळालेल्या अण्णासाहेब राजेभोसले प्राथमिक शाळेचा (हत्तीखाना) विद्यार्थी वैभव सूर्यकांत जाधव याने विमानप्रवासाद्वारे पंतप्रधानांची भेट घेऊन परतल्यानंतर आपले अनुभव ‘लोकमत’ला सांगितले. विमानात बसल्यानंतर भीती वाटली का? या प्रश्नावर वैभवने ‘अजिबात नाही...’ असं उत्तर दिलं. ‘एरव्ही एसटी बसनं अथवा आगगाडीनं प्रवास करताना आजूबाजूची झाडं मागं पडताना पाहायला मिळतात. मात्र, विमानात असं काही दिसेना. विमान टेक आॅन झालं अन् एकाच ठिकाणी स्थिर झालं, असंच वाटत होतं. शुभ्र प्रकाशाच्या बेटावरच जणू आम्ही पोहोचलो आहोत, असा अनुभव मला येत होता. विमानातील पहिलाच प्रवास माझ्यासाठी जितका उत्सुकतापूर्ण तितकाच तो आल्हाददायक आणि आगळा अनुभव देणारा होता. मुंबईतून दिल्लीत पोहोचलो. आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहोत, अशी माहिती देण्यात आली आणि आम्ही सारेच जण भारावून गेलो. ज्या माणसाला आम्ही टी.व्ही. वर पाहत होतो. ‘लोकमत’मध्ये ज्यांच्याविषयी वाचत होतो. त्या मोदींना भेटण्याची दुर्मिळ संधी आम्हाला मिळणार होती. अखेर तो क्षण आला आणि आम्ही आनंदाच्या शिखरावर पोहोचलो.’ सातारचे कंदी पेढे, याची जगभर ख्याती आहे. हेच कंदी पेढे मोदींना देण्यासाठी मी ते सोबत घेतले होते. मोदींना भेटलो. त्यांनी आपुलकीने आमची चौकशी केली. विमान प्रवास कसा झाला? काही त्रास तर झाला नाही ना? या त्यांच्या प्रश्नामुळे भारावून गेलो, असं तो म्हणाला. मोदींच्या भेटीनंतर इंडिया गेट, लाल किल्ला, राजघाट, इंदिरा गांधी पावन स्मृती पाहायला मिळाल्याचेही त्याने सांगितले. (प्रतिनिधी)
मोदींच्या भेटीसाठी सातारचे कंदी पेढे !
By admin | Updated: July 12, 2014 23:48 IST