कुकुडवाड : नुकतीच दिवाळी संपली अन् माण तालुक्यातील स्थलांतराने वेग घेतला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी माण तालुक्यातील जनता मोठ्या प्रमाणात धंदा अथवा व्यवसायानिमित्त तालुक्याबाहेर भिन्न ठिकाणी स्थलांतरित होताना दिसत आहे. मेंढपाळ, ऊसतोड कामगार, रंगकाम करणारे गाव सोडू लागले आहेत.माण तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. माणवासीय जनतेसाठी दुष्काळ हा पाचवीला पुजलेला. तालुक्याचे सरासरी पाऊसमान ४५० मिलीमीटर; मात्र यंदा फक्त ३५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे झालेल्या पावसाचे पाणी जमिनीत मुरले नाही. पर्यायाने जमिनीतील पाणीही पातळी वाढली नाही. अनेक ठिकाणी पावसाचे प्रमाण केवळ २५० मिलीमीटर इतकेच आहे.माण तालुक्यातील खरिपाची पिके पावसाअभावी वाया गेली, तर उशिरा झालेल्या अपुऱ्या पावसामुळे रब्बीची पिके हाती लागण्याची शक्यता कमी आहे. कांदा पिकामुळे काही शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळाले; मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना बऱ्याच ठिकाणी टँकरने पाणी घालावे लागले. दुसऱ्या बाजूला दराच्या पडझडीमुळे अनेक शेतकऱ्यांना कांदा पिकाने अक्षरश: रडविले. अशा विचित्र अवस्थेत दिवाळीचा सण बहुतांशी माणवासीय जनतेने ओढून-ताणून साजरा केला.दिवाळी झाली अन् माणवासीय जनता आपापल्या सोयीने पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतराच्या तयारीत आहेत. काहीजण स्थलांतराच्या मार्गावर, तर अनेकजण व्यवसाय अथवा धंद्याच्या ठिकाणी पोहोचलेही आहेत. ऊसतोडणी, मेंढपाळ, व्यवसाय व मुंबई, वसई येथेल मातीकाम, रंगकाम हे येथील जनतेचे हक्काचे.पोटापाण्याचे व्यवसाय मेंढपाळ, शेळ्या-मेंढ्यांसह लातूर, बार्शी तसेच मराठवाड्यातील अनेक गावी जातात. जून महिन्यात पाऊस झाल्यानंतरही जनता परत आपल्या गावी येते. या कालावधीत मेंढपाळ करणाऱ्यांना अनेक अडीअडचणींना तोंड द्यावे लागते. प्रसंगी नुकसान ही सोसावे लागते. आपले पशुधन वाचविण्यासाठी येथील जनता गाव व आपले शिवार सोडून परप्रांतात जातात, ही वस्तुस्थिती आहे.ऊसतोडणीसाठी तर माण तालुक्यातील अनेक लोक कुटुंबासह सहा महिने बागायत क्षेत्रात स्थलांतरित होतात. म्हातारी माणसं घर राखण्यासाठी लहान मुलासह गावी राहतात. तर काही लहान मुले, शाळेला दांडी मारून आईबाबासोबत ऊसतोडीला जातात. वळई, बिदळी, पर्यंती, ढाकणी, जांभुळवाडी, कुरणेवाडी, वरकुटे, पानवन, दिवड, पळशी, धामणीसह अनेक गावांतील जनता ऊसतोडणीसाठी वारणा, सह्याद्री, वाळवा तसेच सांगली भागात स्थलांतरित होतात.म्हसवड परिसरातील वीरकरवाडी व इतर वाड्या-वस्त्यांवरील लोक मातीकामानिमित्त वसई (मुंबई) याठिकाणी जातात. तर हिंगणी, हावलदारवाडी, कारखेल, खडकी, संभूखेड परिसरातील अनेक लोक रंगकामानिमित्त मोठ्या प्रमाणात मुंबई येथे काही प्रमाणात बेंगलोर, हैद्राबाद येथे जातात. (वार्ताहर)पाणीप्रश्न सोडविण्याची गरजपोटासाठीव प्राप्त परिस्थितीवर मात करण्यासाठी माणदेशी जनता नोव्हेंबर ते मे महिन्याअखेर इतर प्रांतात स्थलांतरित होतात. या स्थलांतरामुळे प्रामुख्याने मुलांच्या शिक्षणावर विपरित परिणाम होत आहे. माण तालुक्याच्या स्थलांतराला थोपविण्यासाठी येथील जनतेला आपल्या गावात उद्योग व्यवसाय मिळविण्यासाठी माण तालुक्याचा पाणीप्रश्न सोडविणे हा एकमेव उपाय आहे. भविष्यात त्यादृष्टीने उपाययोजना होणे ही काळाची गरज आहे.
पोटाची खळगी भरण्यासाठी माणवासीयांचे स्थलांतर
By admin | Updated: November 23, 2015 00:24 IST