कराड : महाराष्ट्रात पर्यटनाला खूप मोठा वाव आहे. त्यामुळे जागतिक पर्यटन तज्ञांची मदत घेऊन महाराष्ट्राचा नव्याने पर्यटन विकास आराखडा तयार करणार आहे. त्या आराखड्यानुसार महाराष्ट्राला पर्यटनात देशात एक नंबर राज्य करण्याचा आपला मानस आहे असे मत मंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ते प्रथमच मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी कराड येथे त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. मंत्री देसाई म्हणाले, मंत्रीपद स्वीकारल्यानंतर जिल्ह्यात आज प्रथम येत आहे. होणारे उत्स्फूर्त स्वागत हे महायुतीवरील प्रेम मतदार व्यक्त करीत आहेत असे मला वाटते. एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा मला मंत्रिपदाची संधी दिली आहे. माझ्याकडे पर्यटन, खाणीकर्म, माजी सैनिक कल्याण याचा पदभार असून या सगळ्या विभागांना न्याय देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे.
मंगळवारी 'मिलिटरी अपशिंगे'ला जाणार सातारा जिल्हा हा माजी सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील मिलिटरी अपशिंगे या गावात प्रत्येक घरटी एकादा दुसरा माणूस सैन्य दलात काम करतो. त्यामुळे उद्या मंगळवारी दि.२४ रोजी मी अधिकाऱ्यांसमवेत मिलिटरी अपशिंगे गावाला भेट देणार असून त्या गावाच्या विकासासाठी वेगळे काय करता येईल याचा आराखडा तयार करणार असल्याचे मंत्री देसाईंनी यावेळी सांगितले.
प्रतापगडच्या विकासाचा दुसरा टप्पा मार्गी लावणार सातारा जिल्ह्यातील प्रतापगड हा ऐतिहासिक गड आहे. गड संवर्धन करण्याच्या उद्देशाने प्रतापगड चा आराखडा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच तयार केला आहे. त्याला काही प्रमाणात निधी दिला आहे. त्याचा दुसरा टप्पा मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार असून बुधवारी (दि २५) पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन प्रतापगडची पाहणी करणार आहे.