कऱ्हाड : ‘शेतीच्या प्रगतीसाठी कमीत कमी जागेत जास्त उत्पादन घेणे गरजेचे असून, त्यादृष्टीने कृष्णा सहकारी साखर कारखान्याने आखलेल्या ‘ऊसविकास योजना उद्दिष्ट १०० टन व ठिबक सिंंचनातून पाणी व्यवस्थापन’ या योजनेला शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. भविष्यात ही योजना राज्यातही राबविण्याचा विचार करु,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले आणि भाजपाचे प्रदेश चिटणीस, कृष्णा बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांना दिली.कऱ्हाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित १२ व्या यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यानंतर त्यांनी थेट यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या स्टॉलला भेट दिली. कारखान्याचे कार्यकारी संचालक जगदीश हरळीकर यांनी मुख्यमंंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या उपस्थितीत भाजपचे प्रदेश चिटणीस तथा कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना कारखान्याच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ऊसविकास योजनेबाबत लॅपटॉपच्या माध्यमातून सादरीकरण केले. मुख्यमंत्र्यांनी कारखान्याच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या या योजनेचे विशेष कौतुक करून शेतीच्या प्रगतीसाठी डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ राबवित असलेली ही योजना स्तुत्य असल्याचे नमूद केले. भविष्यात ही योजना राज्यात राबविण्याचाही विचार सरकार करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंंदे, माजी सहकारमंत्री विलासराव पाटील, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर आदी मान्यवरांनीही कारखान्याच्या स्टॉलला भेट देऊन योजनांची माहिती घेतली. (प्रतिनिधी)दहा हजार एकर जागेवर लवकरच योजना कृष्णा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सुपिक जमीन, मुबलक पाणी असूनही शेतकऱ्यांकडून योग्य नियोजन होत नसल्याने सध्या एकरी ३२ मे. टन ऊस उत्पादन निघते. चुकीचे पाणी नियोजन, पाण्याचा अतिवापर तसेच रासायनिक खतांचा अतिवापर, यामुळे जमिनीचा पोत घसरत असल्याने कमी उत्पादन होत असून, यावर मार्ग काढण्यासाठी कृष्णा कारखान्याने ऊसविकास योजना आखली आहे. त्याद्वारे एकरी १०० मे. टन उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या योजनेच्या माध्यमातून एका एकरात सरासरी ८५ ते १०० मे. टन उत्पादन घेणे शक्य होणार असून, कारखान्याच्या माध्यमातून दहा हजार एकर जागेवर प्रायोगिक तत्त्वावर ही योजना लवकरच कार्यान्वित केली जाणार असल्याचे डॉ. अतुल भोसले यांनी मुख्यमंंत्र्यांना सांगितले.
‘कृष्णा’ची योजना राज्यात राबविणार!
By admin | Updated: November 26, 2015 00:06 IST