आदर्की : जोरदार वादळी वारे, गारपीट आणि पावसाने झालेल्या नुकसानीनंतरही आदर्की भागातील शेतकऱ्यांनी शेतीची पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. बळीराजा पेरणीसाठी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र जुलैचा मध्य ओलांडल्यानंतरही अद्याप पाऊस सुरु न झाल्याने बळीराजा धास्तावला आहे.खरीप हंगामात या भागात प्रामुख्याने हळवा कांदा, मका, बाजरी आदी पिके घेतली जातात. पाऊस अद्याप सुरू झाला नसल्याने खरीप नापेर राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या भागात होणारे प्रामुख्याने कांद्याचे पीक शेतकऱ्याला चांगला आधार देऊन जाते. त्याद्वारे नंतरच्या रब्बी पिकांचे नियोजन करणे आर्थिकदृष्ट्या सोयीचे ठरत असल्याने खरिपातील कांद्याला नेहमीच प्राधान्य दिले जाते. पावसाअभावी अद्याप कांद्याच्या लागणी होऊ शकल्या नसल्याने आर्थिक साथ देणारा कांदा आणि कुंटुबाच्या पालनासाठी होणारी बाजरी, जनावरांसाठी होणारी मका,पावसाअभावी अद्याप पेरणी न झाल्याचे सर्वच आघाड्यावर शेतकऱ्यांची कोंडी होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. भागात होणाऱ्या परतीच्या मान्सुनवरच येथील रब्बीचे पिके घेतली जातात. परतीचा मान्सून बेभरवशी असल्याने या भागातील शेतकरी मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्या पावसावर घेतलेल्या खरीप पिकांचाच आधार मानतो आणि यावर्षी खरीप नापेर राहिला तर काय या विंवंचनेत शेतकरी आहे. (वार्ताहर)
खरीप कांदा, रडविणार यंदा!
By admin | Updated: July 16, 2014 01:24 IST