दशरथ ननावरे -- खंडाळा -पहाटेचा गार वारा, डोळ्यावर असणारी धुंदी आणि घाटातून सुरू असणारा प्रवास आल्हाददायी वाटण्यापेक्षा खंबाटकीत झालेला अपघात प्रवाशांचा थरकाप उडविणारा ठरला. उष:काल होता होता काळरात्र आली; पण केवळ दैव बलवत्तर आणि खंडाळकरांनी केलेले अनमोल सहकार्य याच्या जोरावर प्रवाशांचे जीव वाचले. अपघातात प्रत्येकवेळी खंडाळकर घाटाकडे धावून जातात; मात्र रविवारी केवळ प्रवाशांचे जीव वाचवले नाहीत, तर त्यांना सर्वतोपरी सहकार्य करून हवालदिल झालेल्या प्रवाशांना मायेची ऊब दिली. त्यामुळे खंडाळा पोलीस आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने अनेक प्रवाशांचे डोळेही पाणावले. रविवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या दरम्यान खंबाटकी घाटात जोरदार आवाज झाला आणि झोपेतून जागे झालेल्या खंडाळा व पारगावातील तरुणांचे कान टवकारले. पाय आपोपच घाटाकडे धावू लागले. समोर अस्ताव्यस्त चक्काचूर झालेल्या दोन मोठ्या लक्झरी बस आणि प्रवाशांच्या जिवाचा आकांडतांडव आणि गोंधळ, आरडोओरडा यामुळे घाटातील आसमंतात एकच कल्लोळ माजला होता. खंडाळा पोलिसांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रवाशांना गाडीतून बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. घाटातील सर्व वाहतूक ठप्प झाली होती. त्याकडे पोलिसांनी लक्ष दिले आणि खंडाळकर तरुण प्रवाशांना मदत करू लागले. गाडीच्या तुटलेल्या दरवाजातून आणि खिडकीतून आतमध्ये प्रवेश करून भांबावलेल्या जिवांना आधार देत बाहेर काढण्यात आले. एकामागे एक पाच अॅम्ब्युलन्स धावत आल्या आणि सर्वांनाच ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पोहोचले. चांगल्या कामात कुणीही मदत करतात; मात्र अडचणीच्यावेळी धावून जाणं हे खंडाळ्यातील तरुणांनी प्रवाशांना शिकवून दिलं.केवळ गाडीतून बाहेर काढणेच नाही, तर प्रत्येकाची आस्थेवाईक चौकशी करून कोणाला काय, कोठे इजा झाली, हे लक्षात घेऊन उपचारासाठी पाठवले. सर्व प्रवाशांचे साहित्य ज्याचे त्याला मिळेल, याची दक्षता घेतली.खंडाळा ग्रामीण रुग्णालयातही सर्व वैद्यकीय पथकाने कर्तव्यदक्षपणे जखमींवर उपचार केले. सलग सहा तास हे पथक राबत होते. सकाळी सूर्योदयालाच आभाळ कोसळल्यासारखं झालेल्या रुग्णांना, प्रवाशांना आधार तर दिलाच; पण खंडाळ्यात सामाजिक कार्यकर्ते वैभव धामणकर यांनी सामाजिक भावना जपत सर्वांना अल्पोपहार, चहाची सोय केली. त्यामुळे केवळ पाठीवरती हात न ठेवता, पोटापाण्याची सोय केली. पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी प्रत्येक प्रवाशाचे साहित्य फोटोसह परत केले. त्यांना आपापल्या गावी सोडण्यासाठी स्वतंत्र बसची सोय करून दिली. कोणताही मोबदला न घेता ही सर्व सेवा पुरविण्यात आली. आधार कायम...अपघातातही खडाळकरांचं मायेचं छत्र आभाळासारखं विशाल भासल्याचे प्रवाशांच्या चेहऱ्यावर दिसून येत होतं. धन्यवाद देत डोळे पाणावल्याचे पाहायला मिळाले. अपघाताची काळरात्र एकवेळ प्रवासी विसरून जातील; मात्र खंडाळकरांचा आधार कायम त्यांच्या मनात घर करून राहील, हे निश्चित.
खंडाळकरांची अपघातग्रस्तांना मायेची ऊब
By admin | Updated: November 23, 2015 00:29 IST