राजेंद्र सावंत - मणदुरेदोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधनाच्या सणानिमित्त मूळगाव, ता. पाटण येथील दुर्गम विभागातील प्राथमिक शाळेच्या चिमुकल्या बहिणींनी देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकांना आपल्या खाऊच्या पैशातून राख्या पाठविल्या. देशाचे रक्षण करणाऱ्या या बांधवांना त्या राख्यांबरोबर ‘बंधू तुझे सलाम’, ‘धागा बंधन का, राखी बहन की’ असे अनोखे संदेशही पाठविण्यात आले आहेत. पाटणच्या दक्षिण बाजूस कोयना नदी तीरावर मूळगाव हे गाव वसले आहे. या गावात सातवीपर्यंत प्राथमिक शाळा असून, शंभर मुली या शाळेत शिकत आहेत. या अगोदर विविध उपक्रम राबविण्यात, व्यावहारिक कौशल्ये, खेळ , विविध स्पर्धा परीक्षेत नावीन्यपूर्ण सहभाग या शाळेने नोंदविला आहे.देशाच्या सीमेवर अहोरात्र डोळ्यात तेल घालून आपल्या देशाचे संरक्षण करण्यात सैनिक बांधवांचे मोलाचे योगदान आहे. त्यांना कधीही सणासुदीचा आनंद घेता येत नसतो. या राखीपौर्णिमेला या छोट्याशा गावातील बहिणींनी सीमेवरील बांधवांसाठी आपल्या खाऊच्या पैशातून सुमारे ५०० राख्या नुकत्याच पाठविण्यात आल्या. त्यांना मुख्याध्यापिका माधुरी पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
खाऊच्या पैशातून जवानांना पाठविल्या राख्या
By admin | Updated: August 26, 2015 21:15 IST