मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात खासदार श्रीनिवास पाटील यांनी म्हटले आहे, मी स्वत: कुस्तीशौकीन असल्याने अनेक दिवंगत हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी पहिलवानांना ओळखत होतो. तसेच सध्या हयात असणाऱ्यांनाही ओळखतो. अनेक महाराष्ट्र केसरी व हिंद केसरी मल्ल गावोगावी जत्रेवर भरणाऱ्या कुस्त्यांच्या फडात मला भेटतात. अनेक फडांवर हजेरी लावल्यावर ग्रामस्थ तसेच कुस्ती शौकीन वाटखर्ची रूपाने अशा पहिलवानांना आदराने सन्मानधन देतात. तसेच त्यांना मानाने वागविण्याची प्रथा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आहे. त्यांच्या खुराकाचा खर्च फडावरच्या लढतीवर मिळणाऱ्या मानधनातून भागविता येत असे. याशिवाय निवृत्त पहिलवान हेच पुढे वस्ताद, प्रशिक्षक म्हणून नवीन पहिलवान तयार करतात. मात्र, गेली दोन वर्षे ते कोरोनाच्या अडचणीमुळे शक्य झालेले नाही. कोरोना संसर्गामुळे यात्रा, उत्सवातून आयोजित होणारी कुस्त्यांची मैदाने थांबली आहेत. त्यातच महागाई वाढली आहे. परिणामी, उत्तराधिकाऱ्यांना आणि हयात मानकऱ्यांना आपले कुटुंब चालविणे अशक्य झाले आहे. ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पहिलवानांना खुराक आणि उदरनिर्वाहासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे मानधनात भरघोस वाढ करावी, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी केली आहे.
कुस्तीपटूंच्या मानधनात वाढ करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:42 IST