प्रमोद सुकरे- कऱ्हाड -राज्यात जरी भाजप-सेना युतीचे सरकार असले तरी कोणत्याही कामाचे श्रेय भाजप मित्रपक्षालाही द्यायला तयार दिसत नाही. असाच काहीसा अनुभव कऱ्हाडात येत्या बुधवारी होणाऱ्या यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त येऊ लागलाय. कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ‘भाजप-सेने’च्याच सात मंत्र्यांची नावे अग्रक्रमाने आहेत. मात्र सातारा जिल्ह्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची नावे पत्रिकेवरून गायब झाली आहेत. गेल्या बारा वर्षांची परंपरा प्रथमच खंडित केली गेली आहे.महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीनिमित्त गेली १२ वर्षे कऱ्हाडला यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन भरविले जाते. यशवंतरावांच्या पुण्यतिथीनिमित्त २५ नोव्हेंबरला राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह बहुतांशी मंत्रिमंडळ कऱ्हाडला त्यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करायला हजेरी लावते. त्यामुळे प्रत्येक वर्षी मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन होते. त्याच परंपरेनुसार गतवर्षीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते अन् यंदाही होणार आहे. मात्र संयोजकांनी छापलेल्या यंदाच्या निमंत्रण पत्रिकेवर भाजपचाच पगडा दिसत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह महसूल, कृषिमंत्री एकनाथ खडसे, सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, अन्न व नागरीपुरवठा मंत्री गिरीश बापट, गृह व पर्यटन राज्यमंत्री प्रा. राम शिंदे या भाजपच्या मंत्र्यांची नावे आहेत. तर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री असणाऱ्या विजय शिवतारे या एकमेव सेनेच्या मंत्र्याचे नाव पत्रिकेत आहे. हे कृषी प्रदर्शन शेती उत्पन्न बाजार समिती आयोजित करत असते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ही बाजार समिती काँग्रेसचे बंडखोर माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर व भाजपचे प्रदेश सरचिटणीस डॉ. अतुल भोसले यांनी ताब्यात घेतली आहे. कदाचित त्यामुळे तर भाजपचा वरचष्मा दिसत नसेल? आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शिवसेनेचे पाटणचे आमदार शंभूराज देसाई व माथाडींचे नेते विधानपरिषद आमदार नरेंद्र पाटील वगळता जिल्ह्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना निमंत्रण पत्रिकेवरून हद्दपार करण्यात आले आहे. त्यामुळे यशवंतरावांच्या कार्यभूमीत त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त, त्यांच्या नावाने होणाऱ्या कृषी प्रदर्शनापासून जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीला जाणिवपूर्वक दूर ठेवल्याची चर्चा आहे; पण हे संयोजकांनी दूर ठेवले आहे की, भाजपच्या कोण्या नेत्याच्या सूचनेवरून दूर ठेवलंय, हे समजायला मार्ग नाही. वास्तविक, सातारा हा काँग्रेस-राष्ट्रवादी विचारांचा जिल्हा मानला जातो. येथे अपवाद वगळता सेनेचा भगवा फारसा कधी फडकला नाही, तर भाजपचे कमळही कधी फुललेले दिसत नाही. अशा पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांना धडा शिकविण्याचा तरी डाव नसेल ना, अशीही शंका उपस्थित होत आहे. यावर्षी खासदार उदयनराजे भोसले, स्थानिक आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील कोणत्याच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदाराचे नाव निमंत्रण पत्रिकेत दिसत नाही. ही भाजपची खेळी आहे की, शेती उत्पन्न बाजार समितीत सत्तांतर झालेल्या नेत्यांची स्थानिक सोय, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. कऱ्हाड बाजार समिती आयोजक असली तरी सह आयोजक म्हणून राज्य शासनाचा कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग यांच्यासह जिल्हा परिषदेचा उल्लेख निमंत्रण पत्रिकेवर दिसतो. शासनाचे पणन मंडळ, कृषी औद्योगिक विकास महामंडळ, राज्य वखार महामंडळ, फलोत्पादन व औषधी वनस्पती महामंडळ व बँक आॅफ महाराष्ट्र हे याचे मुख्य प्रायोजक आहेत. कृषी प्रदर्शनात शासनाचा सहभाग असल्यामुळे निमंत्रण पत्रिकेवर स्थानिक आमदारांसह जिल्ह्यातील आमदारांची नावे आवश्यक असल्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे जयंतराव पाटील मात्र अध्यक्ष निमंत्रण पत्रिकेत जिल्ह्यातील काँगेंस- राष्ट्रवादीच्या आमदारांची नावे नसताना नजीकच्या सांगली जिल्ह्यातील वाळव्याचे आमदार, राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयंतराव पाटील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. त्यामुळे याचीही जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.
कऱ्हाड कृषी प्रदर्शनावर ‘भाजप’ची छाप!
By admin | Updated: November 25, 2015 00:43 IST