मलकापूर : वनवासमाची, ता. कऱ्हाड गावच्या हद्दीत महामार्गावरच कंटेनर उलटल्याने सुमारे दोन तास वाहतूक ठप्प होती. महामार्ग देखभाल विभाग व पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने कंटेनर हटविल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. या अपघातात कंटेनरचालक अरुण रघुनाथ यादव (वय ३५, रा. मनकरवाडी, ता. माण) हा जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बेळगावहून अॅल्युमिनीअम पावडर घेऊन कंटेनर (एमएच४३ वाय२०१) पुण्याच्या दिशेने निघाला होता. अरुण यादव हा कंटेनर चालवित होता. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास वनवासमाची गावच्या हद्दीतील स्वराज इन्स्टिट्यूटसमोर कंटेनर आला असताना अचानक चालक अरुण यादवचा ताबा सुटला. त्यामुळे कंटेनर दुभाजकावर जाऊन सातारा-कोल्हापूर लेनवर पलटी झाला. चालक यादव हा कंटेनरच्या केबिनमध्येच अडकला. अपघाताची माहिती मिळताच तळबीड पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी व महामार्ग देखभाल विभागाचे अमित पवार, गजानन सकट, रमेश खुणे, अमोल भिसे त्याठिकाणी आले. त्यांनी जखमी चालकास कंटेनरमधून बाहेर काढून रुग्णालयात हलविले. सकाळी साडेदहा वाजता कंटेनर महामार्गावरून हटविण्यात आला. (वार्ताहर)
कंटेनर उलटल्याने महामार्ग दोन तास ठप्प
By admin | Updated: May 18, 2015 00:57 IST