कातरखटाव : राज्यातील विविध कार्यकारी सोसायटीच्या व्यवस्थापन खर्चासाठी पीक कर्ज वाटपाच्या एक टक्के रक्कम मिळावी, यासाठी राज्यातील गटसचिवांनी दि. ९ पासून लेखणी बंदआंदोलन सुरू केल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अब्दूल उर्फ बंडा मुलाणी यांनी दिली. दरम्यान सातारा जिल्ह्यातील सर्वच गटसचिव यामध्ये सहभागी झाले आहेत.मुलाणी म्हणाले, राज्याती ६८ लख २५ हजार शेतकऱ्यांना २२ हजार विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून सुमारे २० हजार कोटी रुपयांचे शेतकऱ्यांना कर्जवाटप केले जाते. या कर्जवाटपात सोसायटीचे गटसचिव महत्त्वाची भुमिका बजावतात. शासनाच्या विविध योजना थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याचे काम गटसचिव करीत असताना शासन गटसचिवांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी राज्यातील गटसचिवांनी १ फेब्रुवारी ते २७ मार्च २०१२ अखेर दोन महिने कामबंद आंदोलन केले होते. या दरम्यान सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या बावडा या गावी आंदोलन केले होत तर २५ व २६ मार्चला मुंबईच्या आझाद मैदानावरही ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी शासनाने पीक कर्ज वाटपाच्या एक टक्के रक्कम संस्थेच्या व्यवस्थापनासाठी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दोन वर्षे उलटूनही शासनाने याकडे कानाडोळा केल्याच्या निषेधार्थ दि. ५ जूनपासून संघटनेचे पदाधिकारी यांनी आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन सुरू केले असून आजपासून राज्यातील सर्वच गटसचिवांनी लेखणीबंद आंदोलन सुरू केले आहे. पीक कर्ज वाटपाच्या १ टक्के रक्कम संस्थेस मिळावी व राज्य शासनाने गठीत केलेल्या जिल्हास्तरीय समित्यांना फायनान्सियल अधिकार देऊनल राज्यातील गटसचिवांना सेवा नियम जिल्हास्तरीय कमिटीमार्फत करून गावपातळीवर शासनाने नियंत्रण रहावे, यासाठी खटाव तालुक्यातील सर्व गटसचिवांनी सहभागी होण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष संदीप सकपाळ यांनी केले आहे. (प्रतिनिधी
गटसचिवांचे ‘लेखणी बंद’ आंदोलन सुरू
By admin | Updated: June 11, 2014 00:56 IST