कऱ्हाड : ढेबेवाडी फाटा ते कोल्हापूर नाकादरम्यानच्या महामार्गालगत नाल्यामध्ये गवत आणि झाडेझुडपे वाढली आहेत. त्यामुळे वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. तसेच गटारमधील पाण्याच्या प्रवाहालाही अडथळा होत आहे. पाणी साचून राहिल्याने दुर्गंधी पसरत असून, त्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
डासांचा उपद्रव
कऱ्हाड : वातावरणातील बदलामुळे कऱ्हाडसह मलकापूर, आगाशिवगरनगर परिसरात डासांच्या उत्पत्तीत वाढ झाली आहे. घरोघरी डासांचा त्रास वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. अगोदरच वातावरणात वाढलेली उष्णता आणि त्यातच डासांचा उपद्रव वाढल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. डासांपासून बचाव करण्याचा प्रयत्न होत आहे.
श्वानांची दहशत
मसूर : येथील कोरेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चौकात श्वानांची दहशत वाढली आहे. चौकात दररोज रात्री १५ ते २० श्वान रस्त्यावर आढळून येत आहेत. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांत भीती निर्माण होत आहे. चारचाकी वाहनधारकांना फारशी भीती नाही. मात्र, दुचाकीस्वारांचा पाठलाग होत असल्याने अपघाताची शक्यता आहे.
पोलिसांची कारवाई
कऱ्हाड : शहरामध्ये विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून चौकशी करून कारवाई करण्यात येत आहे. विनाकारण फिरणाऱ्यांची वाहने पोलिसांनी जप्त केली असून, वाहतूक शाखेत ती लावण्यात आली आहेत. शहरातील कोल्हापूर नाका, भेदा चौक, विजय दिवस चौक तसेच कृष्णा नाक्यावर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे.