शिरवळ : शिरवळमधील कचरा तीन महिन्यांपासून धुमसत आहे. शिरवळ ग्रामपंचायतीच्या कचरा प्रश्नाकडे सातारा येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप शिरवळमधील सटवाई कॉलनी व फुलमळ्यातील रहिवाशांनी केला आहे.
आशियाई महामार्ग ४७ वरील शिरवळ ही महत्त्वाची बाजारपेठ व औद्योगिकदृष्ट्या प्रगतशील शहर म्हणून ओळखले जाते. शिरवळ ग्रामपंचायतीच्या गलथान कारभाराचा फटका शिरवळकरांना बसला असून कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रामपंचायतीतर्फे शिरवळचा कचरा सटवाई कॉलनी व फुलमळ्यालगत असणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, पाटबंधारे विभागाच्या जागेत अनधिकृतपणे टाकण्यात येत आहे. कचऱ्याला अचानकपणे आग लागून परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट निर्माण होत आहेत.
ग्रामपंचायतीने येथील कचरा प्रकल्प दुसरीकडे हलवावा, या मागणीचा ठराव ग्रामसभा व विविध मार्गे ग्रामपंचायत सदस्यांसह रहिवाशांनी शिरवळ ग्रामपंचायतीकडे अनेकदा करूनही ग्रामपंचायत प्रशासनाने मागणीला वाटाण्याच्या अक्षदा लावल्या आहेत. कचरा डेपो तीन महिन्यांपासून धुमसत असतानाही शिरवळ ग्रामपंचायतीकडून जाणीवपूूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सटवाई कॉलनी व फुलमळ्यातील रहिवाशांनी केला आहे.
फुलमळ्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या पाण्याच्या बंधाऱ्यामध्ये शिरवळ ग्रामपंचायतीकडून कचरा टाकला जात असल्याने पाणी प्रदूषित होत आहे. येथील विहिरीसह बंधारा व स्मशानभूमीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
हा कचरा मांड ओढ्यामार्गे चक्क नीरा नदीमध्ये जात असतानाही गांधारीच्या भूमिकेत असणाऱ्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणतीही दखल न घेतली गेल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. यावेळी कचरा प्रश्न पेटलेला असताना शिरवळ ग्रामपंचायतीकडून शिरवळ परिसरातील रहिवाशांकरिता ओला कचरा -सुका कचरा वेगळे करण्याची घोषणा ध्वनीक्षेपकावरुन करण्यात आली असताना मात्र ग्रामपंचायतीकडून कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी करण्यात न आल्याने घोषणा हवेतच राहिली आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून पेटणाऱ्या समस्येकडे जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनीच लक्ष द्यावे, अशी मागणी निवदेनाद्वारे केली आहे.
चौकट
बंधारा, स्मशानभूमीसह विहिरींचे अस्तित्व धोक्यात
शिरवळ येथील कचरा तीन महिन्यांपासून पेटलेला असल्याने याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. यामुळे येथील बंधारा, स्मशानभूसह विहिरींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. येथील एका वसाहतीतील रहिवाशांसह सटवाई कॉलनी व फुलमळा येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
कोट
शिरवळ येथील कचऱ्याबाबत वारंवार ठराव व लेखी मागणी करूनही शिरवळ ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारामुळे येथील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे याकडे प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पाटबंधारे विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.
- ज्योती चव्हाण,
ग्रामपंचायत सदस्या, शिरवळ
फोटो ०८शिरवळ
शिरवळ येथील कचरा तीन महिन्यांपासून पेटलेला असून, धुरामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. (छाया : मुराद पटेल, शिरवळ)