सातारा : गणेशोत्सव हा अलीकडे राजकीय व्यासपीठ बनू पाहत आहे. या-ना त्या कारणाने नेतेमंडळी झळकत असतात. विशेषत: पक्षाचे कार्य आणि शुभेच्छाचे फलक ठिकठिकाणी गणेशोत्सवामध्ये पाहायला मिळतात. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता काही दिवसांतच लागू होत असल्यामुळे नेत्यांना आचारसंहितेचा फटका बसणार आहे. साहजिकच यंदा गणेशोत्सव कालावधीत शहरातील फलक नेतेमुक्त दिसतील. दरवर्षी गणेशोत्सव आला की, नेतेमंडळींना हुरूप चढत असतो. गणेशोत्सवात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा खटाटोप सुरू असतो. फलकाद्वारे पक्षाची आणि स्वत:ची भूमिका मांडून एकप्रकारे नेतेमंडळी गणेशोत्सवाचा प्रचाराचे साधन म्हणून वापर करून घेत असतात. त्यामुळे खास करून नेतेमंडळींना गणेशोत्सव हवाहवासा वाटत असतो.यंदा मात्र नेत्यांच्या उत्सवावर पाणी फिरण्याची शक्यता वाढली आहे. विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता काही दिवसांतच लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुठल्याही नेत्यांना फलकावर झळकण्याची संधी मिळणार नाही. त्यातूनही काही नेतेमंडळी कायद्याची पळवाट शोधत असतात. गणेशमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बनवलेल्या फलकावर कुठेतरी कोपऱ्यात एखाद्या नेत्याचा छोटासा फोटो छापला जातो. मात्र, अशा फोटोवरही आचारसंहिता पथकाची करडी नजर असणार आहे. एवढेच नव्हे तर पक्षाची चिन्हे, निवडणूक चिन्ह वापरण्यासही बंदी असते; परंतु काहीजण बिनधास्त अशा प्रकारच्या चिन्हांचे प्रदर्शन करत असतात. पोलीस आणि आचारसंहिता पथक अशा बारीक सारीक गोष्टींवर लक्ष ठेवणार आहे.काही महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतही अनेकजणांनी अचारसंहितेचा भंग केल्याची उदाहरणे आहेत. त्यावेळी काहीजणांवर गुन्हेही नोंद झाले आहेत. कोणी स्वत:च्या गाडीवर पक्षाचे चिन्ह लावतो तर कोणी डोक्यात पक्षाच्या चिन्हाची टोपी घालून आचारसंहितेचा भंग करत असतो. लोकसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यात एकूण १३ आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल झाले आहेत. लोकसभा निवडणुकीतून मिळालेला धडा आता विधानसभा निवडणुकीत तरी कार्यकर्ते व नेत्यांनी घ्यावा, एवढीच अपेक्षा पोलिसांची आहे. त्यादृष्टीने पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. (प्रतिनिधी)अनेकदा आचारसंहितेचे पालन न केल्यामुळे पक्षाचा कार्यकर्ता अथवा पदाधिकाऱ्यावर गुन्हे दाखल होत असतात. मात्र यातील एकालाही अद्याप याप्रकरणी शिक्षा झाल्याचे कोणालाही ऐकीवात नाही. अचारसंहितेचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढे या प्रकरणाचे काय होते, याची सर्वसामान्यांना उत्सुकता असते. केवळ निवडणुकीपुरतेच अचारसंहिता गुन्ह्यांची चर्चा होते. कालांतराने हे सर्व विसरले जाते. आचारसंहितेचा भंग केल्याचे तहसीलदार आणि पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्या फलकाचा फोटो काढला जातो. शहानिशा करून संबंधितांवर गुन्हा दाखल केला जातो. निवडणूककाळात कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आचारसंहितेचे पालन करावे.-राजीव मुठाणे पोलीस निरीक्षक
गणेशोत्सवात नेत्यांचे फ्लेक्स सुने-सुने!
By admin | Updated: August 28, 2014 22:22 IST