फलटण : शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सवकाळात शासनाने पारित केलेल्या आदेशानुसार गणेशोत्सव साजरा करावा. सार्वजनिक मंडळांनी ध्वनिप्रदूषण होणार नाही याची खबरदारी घ्यावी. सोबतच सार्वजनिक मंडळाच्या ठिकाणी आगप्रतिबंधक वाळूच्या बादल्या, पाण्याचा साठा, अग्निशमन सिलिंडर ठेवावेत,’ असे आवाहन फलटणचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी केले.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मुख्याधिकारी गायकवाड यांनी म्हटले आहे की, गणेशोत्सव मंडळांनी स्त्री-भ्रूण हत्या, लेक वाचवा अभियान, स्वच्छ फलटण अभियान, मानव अधिकार आणि कर्तव्य, कोरोनाविषयक जनजागृती करावी. मंडपाच्या ठिकाणी शासनाने प्रतिबंध घातलेल्या उत्पादनाच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात येऊ नये. गणेशोत्सवकाळात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मंडपामध्ये निर्जंतुकीकरण, थर्मल स्क्रीनिंगची सोय उपलब्ध करावी. श्रींच्या आरतीसाठी मंडळाचे कमीत कमी प्रतिनिधी उपस्थित राहून सोशल डिस्टन्सिंग तसेच स्वच्छतेचे नियम पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. गणेशाची आगमन व विसर्जन मिरवणूक काढण्यात येऊ नये. विसर्जनावेळी पारंपरिक पध्दतीत विसर्जनस्थळी होणारी आरती मंडपात करून विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण गल्लीतील, कॉलनी किंवा वसाहतीतील सर्व घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरीत्या काढण्यात येऊ नये. घरगुती व सार्वजनिक गणपती विसर्जन कॅनोल, नदी, विहीर किंवा तलावामध्ये करू नये. गणपती विसर्जन दिवशी नगर परिषदेकडे गणेशमूर्ती दान करून निर्माल्य जमा करावे.