दहीवडी : माण-खटावला वरदान ठरणाऱ्या जिहे-कटापूरचे पाणी २०२१ मध्ये माणच्या शिवारात खेळणार आहे. वर्धनगडपासून अपवाद वगळता नवलेवाडीपर्यंत जवळपास १४ किलोमीटर असणाऱ्या बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या वर्षभरात जिहे-कटापूरचे पाणी नेर व आंधळी धरणात पडून ते संपूर्ण शिवारात खेळणार आहे.
माण तालुक्याला जिहे-कटापूर टेंभू उरमोडी या योजनेचे पाणी येते. उरमोडीचे पाणी माण तालुक्यात आले आहे. टेंभूच्या पाण्यातून माणच्या १६ गावांना पाणी मिळणार आहे. मात्र सर्वात वरदान ठरणारी जिहे-कटापूर योजना पूर्ण झाल्याशिवाय माण तालुका सुजलाम सुफलाम होणार नाही, ही वस्तुस्थिती आहे.
येथील शेतकरी पाणी आता येईल, मग येईल, हे ऐकत आला आहे; पण बोगदाच पूर्ण नसल्याने हे शक्य होणार नव्हते. १९९५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी पश्चिम महाराष्ट्रासाठी कृष्णा खोऱ्याची स्थापना केली. या योजनेमध्ये जिहे-कटापूरचा समावेश केला. सुरुवातीला २५० कोटींची योजना कालांतराने १५०० कोटींवर गेली. त्यामुळे योजना अर्धवट आहते की काय, अशी शंका होती. मात्र गेल्यावर्षी या योजनेला केंद्रीय जलआयोगाची मान्यता मिळाली व भरीव निधीची तरतूद झाली. त्यानंतर रात्रंदिवस काम सुरू आहे. वर्धनगड वेटणे रणसिंगवाडी, शिरवली, नवलेवाडी या ठिकाणांहून काम सुरू होते. जावळपास १४ किलोमीटर असणारा हा बोगदा शिरवलीपर्यंत पूर्णत्वाकडे गेला आहे. शिरवलीपासून साधारण चार किलोमीटर अंतरावर नवलेवाडीकडे जाणारा शेवटचा टप्पा ४ किलोमीटरचा आहे. तब्बल ३३० फूट जमिनीखालून आहे. या बोगद्याचे काम तीन किलोमीटरपेक्षा जास्त झाले आहे. हा बोगदा अवघा ७५० मीटर राहिला असून, या ठिकाणचे काम रात्रंदिवस सुरू आहे. हा टप्पा येणाऱ्या सहा महिन्यांत पूर्ण होऊन नेर आंधळी धराणात जिहे-कटापूरचे पाणी येण्यास कोणतीही अडचण भासणार नाही. माण तालुक्याच्या उंच ठिकाणाहून पाणी सुटणार असल्याने तालुक्यातील अनेक गावांत पाणी पोहोचवता येणार आहे.
दुष्काळी १३ तालुक्यांना हक्काचे पाणी मिळावे, यासाठी क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी परिषदांच्या माध्यमातून १९९२ पासून संघर्ष केला आहे. जिहे-कटापूरचे पाणी तालुक्याला मिळाल्यास परिषदेच्या कार्यकर्त्यांना सर्वाधिक आनंद होईल
- विश्वंबर बाबर, अध्यक्ष माण तालुका पाणी परिषद
तेरा गावांना कायमचे पाणी
जिहे-कटापूर योजनेला २०१९ मध्ये केंद्रीय जलआयोगाची मान्यता मिळाली. त्यावेळी ८०० कोटी या योजनेला मंजूर झाले. नाबार्ड व केंद्र सरकार पैसे भरणार असल्याने याचा राज्यावर ताण येणार नाही. या योजनेतून २७.५० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. माण उत्तरमधील ३२ गावांना कायमस्वरुपी पिण्याचे पाणी मिळणार आहे.
फोटो
०५दहिवडी-वॉटर
माण तालुक्याला वरदान ठरणाऱ्या जिहे-कटापूर बोगद्याचे शिरवली येथे उभारलेले जॅकवेलचे काम रात्रंदिवस सुरू आहे.