पत्रकात म्हटले आहे की, देशातील राजकीय विरोधी पक्ष हे शेतकरी आंदोलनाच्या आडून मोदींसह सरकारवर प्रहार करीत आहेत. विरोधी पक्ष शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून लढण्याचा प्रयत्न करीत आहेत. विरोधी पक्षांना शेतकरी आंदोलनातून तोडगा निघावा, शेतकऱ्यांचे भले व्हावे असे वाटते का? वाटत असेल तर महाराष्ट्रातील शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी व इतर पक्षांच्या पुढाऱ्यांनी शांत बसावे. शेतकऱ्यांचा वैचारिक गोंधळ उडवू नये. काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व डाव्या पक्षांनी शेतकरी आंदोलनात बोलणे व शेतकऱ्यांचा कळवळा घेण्याचा अधिकार केव्हाच गमावला आहे. कारण देश स्वतंत्र झाल्यापासून ६० वर्षे तुम्हीच राज्य केले आहे. स्वामिनाथन आयोगाचा अहवाल २०११ साली येऊनही तुम्ही तो राबविलेला नाही. शेतकऱ्यांच्या आजच्या दुरवस्थेला ७० ते ८० टक्के तुम्ही जबाबदार आहात. तसेच केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय राबविले पाहिजेत. कार्पोरेट कंपन्या, मोठे व्यापारी, शहरी ग्राहक यांचे हितरक्षक अशी केंद्र सरकारची प्रतिमा होत चालली आहे. अर्धबळ सैनिक तैनात करण्यापेक्षा शेतकऱ्यांबरोबर चर्चा करण्यासाठी नवे मंत्री, अधिकारी नेमावेत. लवकरात लवकर तोडगा काढावा.
ट्रॅक्टर रॅली, त्यातील हिंसा, पोलिसांवरील दगडफेक हे पाहिल्यावर शेतकऱ्यांच्या व्यथा कोण ऐकूण घेणार? त्यासाठी शेतकरी नेत्यांनी शेतकरी आंदोलनातील भूमिकेचा फेरविचार करावा, असेही पत्रकात म्हटले आहे.