सातारा : जिल्ह्यात पावसाची पूर्णपणे उघडीप असून कोयनेला ३ तर नवजाला फक्त १ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. सकाळच्या सुमारास कोयनेत १०३.३० टीएमसी साठा झाला होता. तर आवक बऱ्यापैकी होत असल्याने कोयनेसह धोम, कण्हेर आणि बलकवडी या प्रमुख धरणांतून विसर्ग सुरूच आहे.
जिल्ह्यात सप्टेंबर महिना सुरू झाल्यापासून पाऊस सुरू होता. हा पाऊस पूर्व तसेच पश्चिम भागातही चांगला पडला. यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. पूर्वेकडील दुष्काळी भागात तर पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले. खरीप हंगामत शेतकऱ्यांनी घेतलेल्या बाजरी, मूग, मटकी, मका आदी पिके चांगली आली. तसेच दुष्काळी भागातील काही ओढ्यांना पाणी वाहू लागले आहे. बंधाऱ्यातही चांगला पाणीसाठा होऊ लागला आहे.
पश्चिमेकडेही पावसाची चांगली बरसात झाली. कोयना, नवजा, महाबळेश्वर, कास, बामणोली आणि तापोळा भागात सतत १५ दिवस पाऊस होता. यामुळे कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी, बलकवडी अशा प्रमुख धरणांत पाणीसाठा वेगाने वाढू लागला. त्यातच महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कोयना धरणातही पाण्याची आवक वाढत गेली. त्यामुळे १०५.२५ टीएमसी साठवण क्षमता असणाऱ्या कोयना धरण यंदा उशिरा का असेना काठोकाठ भरलं. त्यामुळे आवक वाढलेली पाहून पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून विसर्ग करण्यात आला.
यावर्षी कोयना धरणाच्या दरवाजातून दुसऱ्यावेळी विसर्ग करण्यात आला. पाऊस वाढल्याने रविवारी कोयना धरणातील साठा १०४ टीएमसीच्या वर गेला होता. त्यावेळी प्रथम सहा दरवाजे एक फुटाने उचलून नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला. तसेच पायथा वीजगृहातून पाणी सोडण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्यात आला. शेवटी सव्वा पाच फुटांपर्यंत वर दरवाजे घेण्यात आले होते. यामुळे धरण पायथा वीजगृह व दरवाजातून मिळून ५० क्युसेक पाणी विसर्ग सुरू होता. यामुळे कोयना नदीपातळीत वाढ झालेली. दोन दिवस हा विसर्ग सुरू होता. मात्र, त्यानंतर पाऊस कमी झाला. त्यामुळे धरणात पाण्याची आवक कमी होत गेली. परिणामी दरवाजे बंद करण्यात आले.
गुरुवारपासून कोयना धरणाच्या दरवाजे बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे दरवाजातील विसर्ग पूर्णपणे थांबला आहे. तर सध्या धरणाच्या पायथा वीजगृहातूनच २१०० क्युसेक पाणी सोडणे सुरू आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास धरणात ३२१९२ क्युसेक पाण्याची आवक होत होती. तर धरण साठा १०३.३० टीएमसी झाला होता.
चौकट :
महाबळेश्वरला अल्प पाऊस...
मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची उघडीप आहे. पश्चिम भागात तर अल्प पर्जन्यमान होत आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला ३ मिलिमीटर पाऊस पडला. तर जूनपासून आतापर्यंत ४१९६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर नवजाला १ आणि यावर्षी आतापर्यंत ५४९६ तर, महाबळेश्वरला १ आणि जूनपासून ५५६६ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे.
.................................
प्रमुख धरणांतील विसर्ग असा...
मागील काही दिवसांपूर्वी चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे पश्चिम भागातील प्रमुख धरणात पाणी येत आहे. परिणामी धरण पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून विसर्ग करण्यात येत आहे. यामध्ये धोममधून ३७५ क्युसेक, कण्हेर २०५७, बलकवडी धरणातून ३०४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर तारळी, उरमोडी या धरणातून पाणी सोडणे बंद आहे.
........................................................