कराड तालुक्यातील काले, ओंड, ओंडोशी, नांदगाव, मनव, उंडाळे, शेवाळवाडी, जिंती, टाळगाव, घोगाव, येणपे, वाठार, झुजारवाडी, पवारवाडी, चोरमारवाडी, माटेकरवाडी, येळगाव, गोटेवाडी, म्हारूगडेवाडी, आकाईवाडी, साळशिरंबे या गावातील ग्रामस्थांना वाकुर्डे योजनेच्या माध्यमातून शेतीसाठी व पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. पण या योजनेचे वीज बिल थकीत असल्याने २०१८ साली या भागातील लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. वीज बिलाची थकीत रक्कम जास्त असल्याने शेतकऱ्यांना ही रक्कम भरणे शक्य होणारे नव्हते.
दरम्यान, शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी थकीत वीजबिलाची रक्कम भरण्याचा निर्णय घेतल्याने, या भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात ८ लाख १९ हजार रुपये, तसेच दुसऱ्या टप्प्यात ३ लाख ३१ हजार ९२२ रुपये भरले होते. यापैकी उर्वरित ४ लाख २९ हजार ६३२ रुपयांचा चेक आज पेठ नाका (ता. वाळवा) येथील वाकुर्डे योजनेच्या अधिकाऱ्यांकडे सुपुर्द करण्यात आला.
याप्रसंगी कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक दयानंद पाटील, धोंडिराम जाधव, जितेंद्र पाटील, कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, आदी उपस्थित होते.