सातारा : ‘जैवविविधता, निसर्गसंपन्नता आणि दळवळणाच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्गाने व्यापलेल्या सातारा जिल्ह्यात नवीन कृषी विद्यापीठ स्थापन करावे. त्याचबरोबर पुणे येथे तात्पुरते स्थापन केलेले राष्ट्रीय खरीप बटाटा संशोधन केंद्र सातारा जिल्ह्यात स्थलांतरित करावे,’ अशा दोन आग्रही मागण्या खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि कृषी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केल्या आहेत. निवेदनात म्हटले आहे की, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठांच्या कार्यक्षेत्राची विशाल व्याप्ती लक्षात घेऊन राज्य शासनाने दोन्ही विद्यापीठांचे विभाजन करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार राहुरीच्या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात नऊ जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यापैकी कोणत्या जिल्ह्यात विभाजनानंतरचे नवीन कृषी विद्यापीठ स्थापन करावयाचे याबाबत निर्णय घेण्यासाठी डॉ. यशवंतराव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने समिती नेमलेली आहे. त्यानुसार नवीन कृषी विद्यापीठ सातारा जिल्ह्यात व्हावे, अशी आमची मागणी आहे. येथील माती आणि वातावरण विविधतेने नटलेले आहे. या ठिकाणी चांगले व पोषक वातावरण आहे. तसेच जिल्ह्यात विविध संशोधन केंद्रेही आहेत.त्याचबरोबर सातारा जिल्ह्यात खरीप हंगामातील बटाट्याचे पीक शेतकरी मोठ्या प्रमाणात घेतात. येथील जमीन बटाटा पिकाला जोमदार आहे. त्यामुळे पुण्याला तात्पुरते सुरू करण्यात आलेले राष्ट्रीय खरीप बटाटा संशोधन केंद्र जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात स्थलांतरित करावे, अशी आमची आग्रही मागणी आहे, असेही उदयनराजे यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)
साताऱ्यात कृषी विद्यापीठ स्थापन करा
By admin | Updated: June 17, 2014 00:47 IST