कऱ्हाड (जि. सातारा): पुणे-बंगलोर महामार्गावर थांबलेल्या ट्रकवर भाविकांची भरधाव पिक अप व्हॅन आदळून झालेल्या अपघातात आठजणांचा मृत्यू तर २१ जण गंभीर जखमी झाले. अपघातग्रस्त देवदर्शनासाठी पुण्याहून कोल्हापूरकडे निघाले होते. कऱ्हाडनजीक पेरले गावच्या हद्दीत आज, शुक्रवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. जखमींवर सह्याद्री व कृष्णा रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. अपघातस्थळावरील परिस्थिती एवढी भयानक होती की, कोल्हापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक पोलिसांनी काहीकाळ थांबविली होती. जखमींना रुग्णालयात पाठविल्यानंतर व चक्काचूर झालेल्या पिक अप व्हॅनमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. अपघातातील सर्व मृत व जखमी पुण्याच्या शिरूर तालुक्यातील असून, बहुतेकजण एकमेकाचे नातेवाईक आहेत. अपघातस्थळी मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील काही भाविक गुरुवारी रात्री उशिरा महिंद्रा कंपनीच्या पिक अप व्हॅनमधून (एमएच १२/केपी ३९३महालक्ष्मी व जोतिबा दर्शनासाठी कोल्हापूरला निघाले होते. आज पहाटेच्या सुमारास ते पेरले गावच्या हद्दीत पोहोचले. दरम्यान, डिझेल संपल्याने एक ट्रक (एमएच ०९/सीव्ही ३३३) पेरले येथे महामार्गाकडेला उभा होता. त्यावेळी व्हॅनवरील चालकाचा ताबा सुटल्यामुळे व्हॅनची त्या ट्रकला जोराची धडक बसली. ही धडक एवढी भीषण होती की, सातजणांचा जागीच मृत्यू झाला. तर व्हॅनच्या हौद्यातील बावीसजण जखमी झाले. महामार्गावरून जाणाऱ्या इतर वाहनधारक व प्रवाशांनी वाहने थांबवून मदतकार्य सुरू केले. महामार्ग देखभाल विभागासह विविध रुग्णालयांच्या पाच रुग्णवाहिकांतून जखमींना उपचारार्थ तातडीने कृष्णा व सह्याद्री रुग्णालयांत हलविण्यात आले, तर पत्रा कापून केबिनमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल तांबे, उपअधीक्षक मितेश घट्टे, उंब्रजचे सहायक पोलीस निरीक्षक मारुती पाटील, धनाजी फडतरे, शहाजी निकम, आर. एस. चौधरी यांनी अपघातस्थळी भेट दिली. उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. अपघाताची नोंद उंब्रज पोलीस ठाण्यात झाली आहे. (प्रतिनिधी)
कऱ्हाडजवळ आठ ठार
By admin | Updated: June 14, 2014 01:35 IST