पुसेगाव : येरळा नदी कायमस्वरूपी प्रवाही राहावी, यासाठी नदीच्या उगम स्थानापासून सिमेंट बंधारे, खोलीकरण व रुंदीकरण करून पाणी टंचाईवर कायमची मात करण्यासाठी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल व श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने येरळा नदीच्या पुनरुज्जीवनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.‘जलयुक्त शिवार’ अभियानाला धरून संत समाज आणि शासन यांच्या समन्वयातून येरळा नदीच्या पुनरुज्जीवन कार्यक्रमास याप्रसंगी मठाधिपती सुंदरगिरी महाराज, उपजिल्हाधिकारी सानप, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, देवस्थान ट्रस्टचे डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव, डॉ. भुजबळ, शिवाजीराव जाधव, विजय जाधव, माजी देवस्थान टस्ट अध्यक्ष गुलाबराव वाघ, माजी सरपंच बाळासो जाधव, दिलीप बाचल, रूपेश कदम, देवस्थानचे सचिव अविनाश देशमुख व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला.डॉ. सुरेश जाधव म्हणाले, ‘राष्ट्रीयस्तराचे जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांच्या उपस्थितीत येरळा नदीच्या पुनरुज्जीवन कार्यक्रमाचा व येरळा नदीचे खोलीकरण करण्याचा निर्णय देवस्थानच्या बैठकीत घेण्यात आला होता. खटाव तालुका कायमस्वरूपी दुष्काळी म्हणून ओळखला जातो. याठिकाणी शाश्वत सिंचनाची सोय नसल्यामुळे पावसाच्या पाण्यावरच येथील शेती व्यवसाय सुरू असतो. काही भागांमध्ये दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांपासून पाणीटंचाई सुरू असते. म्हणूनच येथील श्री सवोगिरी देवस्थान ट्रस्टने यापूर्वीच लोकसहभाग, सामाजिक संस्था व ट्रस्टने पुढाकार घेऊन ओढ्यावरती सिमेट बंधारे, पाझर तलाव व बंधाऱ्यातील गाळ काढून जलसंधारणाची कामे केली आहे.संतसमाज आणि शासन यांच्या समन्वयातून हा महत्त्वकांक्षी कार्यक्रम हाती घेतला असून, म्हस्कोबा डोंगरातील येरळा नदीच्या उगमस्थानापासून मांजरवाडी, मोळ, डिस्कळ, ललगुण, नागनाथवाडी, राजापूर काटकरवाडी व खातगुण, खटाव या येरळा नदीच्या काठच्या गावांतील ग्रामस्थांनी तसेच तरुण कार्यकर्त्यांनी यात पुढाकार घेण्याची गरज असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.नदीच्या पुनरुज्जीवन कार्यक्रमासाठी गावोगावात कमिट्या स्थापन करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी उपजिल्हाधिकारी सानप यांनी मनोगत व्यक्तकेले. (वार्ताहर)पाणीटंचाई मिटणार!मांजरवाडी ते पुसेगाव येथे या योजनेतून येरळा नदीवर सिमेंट बंधारे बांधून अनेक जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. येरळा नदीचे पुनरुज्जीवन झाल्यानंतर या नदीचे रुपडे पालटणार असून, खऱ्या अर्थाने नदीशेजारीच्या गावांची पिण्याची व शेतीच्या पाण्याची कायमची टंचाई दूर व्हावी, हा यामागील खरा उद्देश आहे.
कोरड्या येरळेला फुटणार मायेचा उमाळा!
By admin | Updated: November 8, 2015 23:36 IST