चालूवर्षी कांदा उत्पादक शेतकरी वर्गाची दिवाळी होणार गोड. शेतकऱ्याच्या मालाला बाजारात मिळणाऱ्या बाजार भावामुळे आतापर्यंत आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत असतानाच सध्या जीवनावश्यक असणाऱ्या कांद्याने मात्र उच्चांकी दर गाठल्यामुळे आडसाल कांदा उत्पादक शेतकरी वर्गाची दिवाळी गोड झाली आहे. निसर्गाच्या मनात कधी काय येईल, हे कोणालच न उलगडणारं सत्य आहे. आणि या निसर्गाच्या बदलामुळे म्हणा किंवा कांद्याच्या उत्पादनात आलेल्या घटीमुळे बाजारामध्ये एकदम कांद्याचे दर वधारले आणि गृहिणींच्या डोळ्यात कांद्यामुळे नव्हे तर कांद्याच्या दरामुळे पाणी येऊ लागले. आडसाल विकला जाणारा कांद्याचे दर एकदम तेजीत आले. तर खटाव-माण सारख्या दुष्काळी पट्ट्यात आजही कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळ (ऐरण)चा वापर सर्रास शेतकरी वर्ग करताना दिसून येतो का, काढणीनंतर जर कांद्याला योग्य भाव मिळत नसेल तर निघालेल्या कांद्याची योग्यरित्या या चाळीत साठवणूक करून हा कांदा सुरक्षित ठेवला जातो. आणि योग्य दर आल्यानंतर या ऐरणी फोडून बाजारामध्ये विक्रीसाठी पाठवतात. दरवर्षी कांदा उत्पादन करणाऱ्या शेतकरी वर्गाला मिळणाऱ्या उत्पादनातून पिकासाठी केलेल्या खर्चाइतपतही पैसे मिळत नसल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी कांद्याची लागण केली नाही. तर ज्या कोणी केली त्यांना मात्र वधारलेल्या दरामुळे लॉटरीच लागली. आतापर्यंतचा सर्वात उच्चांकी दर चालूवषी कांद्याने गाठला. आणि २५ ते ७० रु पयांपर्यंत दर लागत गेला. त्यामुळे शेतकरीऱ्याला ज्या कांद्याच्या उत्पादनातून उलटी पट्टी येत होती तेथे कांद्याच्या पिकाने विक्रमच केला. आणि कांदा उत्पादक शेतकरी मालामाल झाला. शेतातच कांद्याचा सौदा व्यापारी लोक करू लागल्यामुळे मार्केटमध्येही शेतकऱ्याला जाण्याची गरज पडली नाही. प्रत्येकवर्षी दुष्काळी परिस्थिीती निर्माण होतेच . खटाव-माण तालुक्यांत या दुष्काळी परिस्थितीला येथील शेतकऱ्याला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत बऱ्याच शेतकऱ्याला या पिकाने तारले असल्याचे दिसून येत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना कांद्याच्या उत्पादनातून फायदा झाला आहे. त्यामुळे चालूवर्षी निदान दिवाळी सण तरी उत्साहाने व आनंदाने साजरा करता येईल, याची आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत आहे. कांद्यामुळे मात्र चालूवर्षी शेतकऱ्यांची दिवळी गोड होणार आहे. --नम्रता भोसले
कांद्यामुळेही धुमधडाक्यात दिवाळी
By admin | Updated: November 9, 2015 23:29 IST