कऱ्हाड : शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या भित्तिपत्रकांच्या प्रसिद्धीसाठी कऱ्हाड पंचायत समितीमध्ये अधिकाऱ्यांकडून अनास्था दाखविली जात होती. याबाबत काही दिवसांपूर्वीच ‘लोकमत’ने अधिकाऱ्यांच्या अनास्थेबाबत व फाटलेल्या अवस्थेत असलेल्या भित्तिपत्रकांबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर या प्रकाराकडे अधिकाऱ्यांनी लक्ष दिले व फाटलेल्या स्थितीत असलेली भित्तिपत्रके काढून टाकली आहेत. तर काही ठिकाणी नवीन भित्तिपत्रकेही बसवली. शुक्रवारी पंचायत समितीची मासिक सभा झाली. या सभेत वीजवितरण कंपनीतील अधिकाऱ्यांवर सदस्यांनी चांगलेच ताशेरे ओढले. त्यांच्याप्रमाणे आपलेही भर सभेमध्ये ताशेरे ओढू नये म्हणून नव्या योजनांची फाटलेली भित्तिपत्रके काढून टाकण्यात पंचायत समितीमधील एका विभागातील अधिकाऱ्यांनी धन्यता मानली आहे. मात्र, नव्या योजनांबाबत माहिती देण्याचे औदार्य अजूनही अधिकाऱ्यांकडून दाखविले जात नाही. कऱ्हाड पंचायत समितीमध्ये दोन दिवसांपूर्वी लावण्यात आलेल्या ‘स्वच्छ भारत’ मिशनच्या जिल्हा ‘पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमाची माहिती देणाऱ्या भित्तिपत्रकांची दुरवस्था झाली होती. याचप्रमाणे इतरही ठिकाणी लावण्यात आलेल्या भित्तिपत्रकांची अवस्था वाचता येईना, अशी झाली होती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच दुसऱ्या दिवशी दुरवस्थेत असलेल्या भित्तिपत्रके अधिकाऱ्यांनी काढून टाकले. तर काही ठिकाणी नव्याने भित्तिपत्रके बसवली. या योजनांची माहिती जास्तीत जास्त ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहचावी, या उद्देशाने वाटण्यात आलेल्या भित्तिपत्रकांना काही आरोग्य रुग्णालये, शासकीय कार्यालय तसेच ग्रामपंचायती अशा ठिकाणी लावण्यात आले आहे.कऱ्हाड पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांकडून शासकीय योजनांची माहिती दिली जात नसल्याचे सांगत प्रत्येक मासिक सभेमध्ये सदस्यांकडून तक्रारी केल्या जातात. आम्ही काळजी घेतो, लवकरच काम पूर्ण होईल, आजच बैठका घेतो. अशी मासिक सभेदरम्यान शासकीय अधिकाऱ्यांकडून बतावणी केली जाते. त्यामुळे प्रत्येक सभेवेळी अधिकारी व सदस्य यांच्यात खडाजंगी पाहावयास मिळते. शासकीय योजनांची माहिती काही जवळच्याच लोकांना दिली जात असून, सामान्य शेतकऱ्याला मात्र, ती दिली जात नसल्याचे सदस्यांकडून मासिक सभेदरम्यान अधिकाऱ्यांवर आरोप केले जातात. या अधिकाऱ्यांवर गटविकास अधिकारी यांचा वचक नसल्यानेच असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे अशा प्रकाराबाबत सदस्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)कोपऱ्यातील गठ्ठ्यांबाबत चर्चा !पंचायत समितीमधील शिक्षण विभागाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या आडोशाच्या खोलीसमोर गेल्या दोन महिन्यांपासून पडून शासकीय योजनांच्या फायलींचे गठ्ठे पडून आहेत. या गठ्ठ्यांना गोदाममध्ये हलविण्यात आले तरी चालेल; मात्र याबाबत गटविकास अधिकारी अविनाश फडतरे निर्णय घेत नसल्याने गठ्ठे तसेच पडून आहेत. अशी चर्चा दबक्या आवाजात शासकीय कर्मचाऱ्यांमधून केली जात आहे.इमारतीला मात्र रंगरंगोटीकऱ्हाड पंचायत समितीच्या नवीन इमारतीला नव्याने रंगरंगोटी करण्यात आली आहे. संपूर्ण दोन मजली इमारतीला रंग देण्यात आल्याने बाहेरून इमारत नवीन दिसत आहे. तर आतमध्ये मात्र, भिंतींवर जाळ्या पसरलेल्या आहेत. प्रवेश करताच दृष्टीस नवीन भित्तिपत्रकेशासकीय योजनांची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावी या हेतूने पंचायत समितीमध्ये भित्तिपत्रके लावण्यात आली आहेत. कऱ्हाड पंचायत समिती इमारतीत प्रवेश करताच नवीन शासकीय योजनांचे भित्तिपत्रके दृष्टीस पडतात.‘स्वच्छ भारत’ मिशनअंतर्गत जिल्हा परिषदेतर्फे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी पंचायत समिती तसेच ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष ‘हात धुण्याचे टप्पे’, ‘पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रम’ अशा प्रकारच्या योजनांची व कार्यक्रमांची माहिती देणाऱ्या भित्तिपत्रकांचे वाटप करण्यात आले आहे.
फाटलेली भित्तिपत्रके भिंतीवरून गायब !
By admin | Updated: November 8, 2015 23:41 IST