तारूख विभाग उंडाळकरांचा बालेकिल्ला मानला जातो. याच बालेकिल्ल्यात नुकत्याच झालेल्या बामणवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत दसऱ्या गावातील उंडाळकर गटाच्या काही कार्यकर्त्यांनी ढवळाढवळ केल्याने स्थानिकांना ते पचनी पडले नाही. त्यातच गटाअंतर्गत असलेल्या मतभेदामुळे डॉ. अतूल भोसले गटाने प्रथमच निवडणुकीत रणशिंग फुंकून दोन उमेदवार उभे केले. ते दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले.
परिणामी उंडाळकर गटाचा प्रभात दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. अशातच उंडाळकर गटामधून अनेकदा विविध राजकीय पदे भुषविलेले एक उंडाळकर समर्थक आगामी होऊ घातलेल्या कृष्णा साखर कारखाना निवडणुकीसाठी भोसले गटाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. परिणामी उंडाळकर गटाला जणू या विभागात ग्रहणच लागले की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- चौकट
अंतर्गत वाद ठरतोय कारण
उंडाळकर गटाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या तारूख विभागात गटाअंतर्गत मोठे मतभेद असल्याचे बामणवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत निदर्शनास आले. याच मतभेदामुळे उंडाळकर गटाचे अस्तित्व कमी होत असल्याचे दिसून येते आहे. याला उंडाळकर समर्थकच जबाबदार असल्याचीही चर्चा आहे. याच वादातून काही कार्यकर्ते कृष्णा साखर कारखान्याच्या माध्यमातून आपले नवीन अस्तित्व तयार करू पाहत आहेत.