वाठार निंबाळकर : ‘हिंमत असेल तर खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा अपक्ष निवडणूक लढवावी. आपणही लढण्यासाठी तयार आहोत,’ असे खुले आव्हान देत विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केला.श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या प्रचारार्थ निरगुडी, उपळवे, ढवळ तसेच हिंगणगाव येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते दादाराजे खर्डेकर, माजी नगराध्यक्ष रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, रामभाऊ ढेकळे, एल. आर. जाधव, सुरेश सोमण, शिवाजीराव सस्ते, राजेंद्र सस्ते, बापूराव लोखंडे आदी उपस्थित होते.रामराजे म्हणाले, ‘मी ही फूटपायरीचा सम्राट आहे. त्यांनी माझ्या नादाला लागू नये. आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांनी एक कारखाना एक रस्ता, एक शाळा, एक इमारत, एक गटार यापैकी काय बांधलेय. जमीन विकताना सर्वकाही साखर आयुक्त, संचालक यांच्या सूचना व आदेशांचेच व्यवहार केला आहे.’खंडाळा, फलटणच्या औद्योगिक वसाहतीत मी कंपन्या आणल्या; मात्र हे आता प्रत्येक ठिकाणी संघटना करून माथाडी घ्या, यासाठी वाद करत आहेत. राज्यात जलसंपदा विभागाच्या तीन वेगवेगळ्या चौकशा सुरू आहेत. यापैकी कुठेही आपण अध्यक्ष असलेल्या कृष्णा खोरे महामंडळाचा समावेश नाही,’ असेही रामराजे म्हणाले.रामराजे पुढे म्हणाले, ‘जावळीत सातबाऱ्यावर खोटी नावे चढवून जमिनी विकायचा सपाटा लावला आहे. त्यांना जर फलटण व श्रीराम कारखान्याचा एवढाच पुळका आहे, तर का देत नाही पन्नास कोटी? आपण सभापतिपदावर असताना खासदारकीची निवडणूक लढवू शकतो. उदयनराजेंनी राजीनामा देऊन अपक्ष म्हणून लढवावी. यांच्या दहशतीला जिल्हा कंटाळला असून, असे छत्रपती या जिल्ह्यात नव्हे, तर महाराष्ट्रातही जन्माला येऊ नयेत. सध्या हे शिवसेनेने पालकमंत्री यांच्या गाडीत गळ्यात गळा घालून फिरत असतात.’ (प्रतिनिधी)‘श्रीराम’च्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी पुढाकार : उदयनराजेसातारा : ‘श्रीराम साखर कारखान्यावर राज्य बँकेचे फक्त २६ कोटींचे कर्ज होते. हे कर्ज भागविण्यासाठी कारखान्याकडे जवाहर कारखान्याकडून मिळालेले १८ कोटी व दोन वेळा कारखान्याची जमीन विकून मिळालेले बारा कोटी रुपये असे तीस कोटी होते. मात्र, राज्य बँकेचा बागुलबुवा करून २६ कोटींचे कर्ज भागविण्यासाठी साडेएकवीस एकर जमीनविक्रीचे कटकारस्थान रचले आहेत,’ असा आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे केला आहे.खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्य बँकेचे कर्ज भागविण्यासाठी कारखान्याकडे पुरेशी रक्कम होती. तरीही कवडीमोल दराने जमीनविक्री करणे संशयास्पद आहे. कारखान्याकडे त्यावेळी असलेले तीस कोटी गेले कोठे, याची चौकशी व्हायला हवी. सभासदांच्या हितासाठी आम्ही न्यायालयीन आणि सहकार खात्यामार्फत चौकशी सुरू करण्यासाठी कार्यवाही करणार आहोत.कारखाना पोटनियमात जमीनविक्रीची तरतूद नाही. सातारा येथील न्यायालयाचा जप्ती आदेश असताना या आदेशाचे उल्लंघन करून न्यायालयाचा अवमान केला आहे. जमीनविक्रीच्या नियमांना तिलांजली देऊन, सभासदांची दिशाभूल करून २१ एकर २० गुंठे जमीनविक्रीचा लिलावप्रक्रिया दहशतीखाली पूर्ण केली. एका व्यक्तीने लिलावप्रक्रियेत भाग घेऊन जमीन साठ कोटींना घेण्याची तयारी दर्शविली होती. त्यांना दमबाजी करून हुसकावून लावण्यात आले. जमीनविक्रीत सभासदांना प्रथम अधिकार असतो. तथापि सभासदांना कोणत्याही प्रकारे विचारलेही नाही. उलट कारखान्याचे सभासद जादा किमतीला जमीन घेण्यात तयार होते. मात्र त्यांना वंचित ठेवले. ही मोठी शोकांतिका आहे, असेही खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकात म्हटले आहे.इतक्या बेडरपणे सभासदांचा आणि कारखान्याचा गळा घोटून केलेली जमीनविक्री व जमीन घेतलेले समाजात खुलेआम फिरत आहेत. म्हणूनच या व्यवहाराची पोलखोल करणे आवश्यक आहे. अशांची चौकशी करण्यासाठी अटक करावी,’ असेही उदयनराजेंनी पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी) रामराजे-रघुनाथराजे उवाच...छत्रपतींचे नाव सांगणाऱ्यांच्या शरीरात जर सईबाई, शिवरायांचे रक्त असेल, तर कदाचित ते इतक्या खाली जाऊन बोलले नसते. जे काल त्यांच्याबरोबर बगलेत बसले होते. त्यापैकी चारजणांचे फोन आपल्याला रात्रीच जिल्हा बँकेच्या तिकिटासाठी आले होते.यापुढे आमचे छत्रपती शिवेंद्रसिंहराजेच. उदयनराजे नाहीत. मटकावाले, दारूवाले व टेंडरवाले हेच त्यांचे कार्यकर्ते आहेत. त्यांचे सध्या महाबळेश्वरला विनापरवाना थ्रीस्टार हॉटेल सुरू आहे. विनापरवाना केवळ दहशतीवर त्यांना बाटली, ग्लासशिवाय काहीही दिसत नाही
खासदारकीचा राजीनामा देऊन आमने-सामने या!
By admin | Updated: April 3, 2015 00:45 IST