सातारा : करंजेनाका- म्हसवे या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ तिसऱ्यांदा नारळ फोडून करण्यात आला. यापूर्वी याच रस्त्याचा दोन वेळा नारळ फोडण्यात आला होता, असा आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी यावेळी केला.शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बनुगडे-पाटील यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत पिलेश्वरीनगर येथे रस्त्याचा प्रारंभ झाला. यावेळी जिल्हा युवा सेना अध्यक्ष रणजितसिंह भोसले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नंदकुमार घाडगे, उपजिल्हा प्रमुख दिनेश बर्गे, चंद्रकांत जाधव, तालुका प्रमुख हरिदास जगदाळे, बी. ए. पाटील, कार्यकारी अभियंता एस. एस. पोरे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब गोसावी व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.करंजेनाका-म्हसवे या रस्त्याचे काम बरेच दिवस रेंगाळलेले होते. या रस्त्याच्या कामासाठी अगोदरच दोनवेळा नारळ फुटले होते; मात्र कोणत्याही प्रकारे कामास सुरुवात झाली नव्हती, असे यावेळी सांगण्यात आले. प्रा. बानुगडे-पाटील म्हणाले, ‘रस्त्यासाठी पालकमंत्री विजय शिवतारे यांनी आपल्या फंडातून १५ लाखांचा निधी त्वरित उपलब्ध करून दिला आहे. शिवसेनेचे चिन्ह ‘धनुष्यबाण’ हे शस्त्र आहे. एकदा बाण सुटला की, तो सुटला. तसेच एक शब्द सुटला की, तो पूर्ण करणे हेच शिवसेना आपले ध्येय समजते. या भागातील अडचणींसाठी आम्ही सदैव तत्पर राहू,’ असेही त्यांनी सांगितले.म्हसवेचे सरपंच संजय शेलार याचे याकामी विशेष सहकार्य मिळाले आहे. कार्यक्रमास सुरेश चिंचकर, सतीश मोरे, सुरेश साळुंखे, संदीप झरेकर, सुनील भोज, आनंद सावंत, जयप्रकाश फरांदे, विलास पिसाळ, बोराटे, मेजर शेळके, दिनकर कामटे, मोहन कचरे, चंद्रकांत पोंडकर, सूर्यकांत कदम, शिवतेज तरुण मंडळाचे कार्यकर्ते, पिल्लेश्वरी व म्हसवे व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजकुमार महाडिक यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
एकाच रस्त्याच्या कामाचा तिसऱ्यांदा फुटला नारळ !
By admin | Updated: November 10, 2015 23:50 IST