सातारा: वीज तारेला स्पर्श होऊन मृत्यू झालेल्या बालकाच्या आयुष्याची किंमत वीज कंपनीने अवघी २० हजार केल्याने संपूर्ण परिसरात संताप व्यक्त होत असून, वीज कंपनीच्या या भोंगळ कारभाराविरोधात आत्मदहन करण्याचा इशारा संबंधित चिमुरड्याच्या नातेवाइकांनी दिला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २७ जून २०१५ रोजी नांदवळ, ता. कोरेगाव येथे शेतात गेलेल्या शिवम दिनेश चौधरी या अवघ्या ११ वर्षांच्या मुलाचा विद्युत खांबाच्या तारेला स्पर्श होऊन मृत्यू झाला. या घटनेतंतर वीज कंपनीचे अधिकारी घरी आले व प्रकरण मिटवामिटवीची चर्चाही करू लागले; मात्र चौधरी यांनी संपूर्ण घटनेची चौकशी करण्याची मागणी केली. त्या दरम्यान, वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तातडीची मदत म्हणून २० हजार दिले. परंतु त्यानंतर या कुटुंबाला त्यांनी वाऱ्यावर सोडले. एका चिमुरड्याच्या मृत्यूची किंमत अवघी २० हजार केली गेल्याने वीजवितरण कंपनीविरोधात संतापाचे वातावरण असून, ज्यांच्या चुकीमुळे त्याचा मृत्यू झाला त्यांनी ती जबाबदारी टाळल्यास तीव्र परिणाम भोगावे लागतील, असा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
चिमुरड्याच्या जिवाची किंंमत २० हजार?
By admin | Updated: November 28, 2015 00:22 IST