राहुल तांबोळी -भुर्इंज वाई तालुक्यातील भुर्इंज येथील शाळा, विद्यालयांसह विविध परिसरात सुमारे दहा वेडे फिरत आहेत. विशेषत: शाळा आणि विद्यालय परिसरात हे वेडे फिरत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. अचानकपणे एवढ्या मोठ्या संख्येने गावात वेडे आल्याने भुर्इंजमध्ये येड्यांची जत्रा भरल्याचे चित्र दिसत आहे. वास्तविक वेडे लोक हे मानसिक आजाराने त्रस्त असतात. अशा रुग्णांना उपचार देण्याची सुविधा राज्य शासनाने उपलब्ध केली आहे. त्यासाठी विविध संस्थांसह अनेकांना अनुदानही दिले जाते. असे असताना त्या संस्था किंवा संबंधित जबाबदार या वेड्यांना आपल्या संस्थेत का दाखल करून घेत नाहीत, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. महामार्गावर फक्त एक आणि एकच भुयारी मार्ग सुस्थितीत आहे. तो म्हणजे भुर्इंज येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयासमोरील. भुर्इंज गावामध्येही एक आहे; मात्र तो बंद करण्यात आला आहे. कर्मवीर विद्यालयासमोरील भुयारी मार्ग सुसिस्थित ठेवण्याचे श्रेय स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष भैय्यासाहेब जाधवराव-इनामदार आणि प्राचार्य आर. एस. पाटील यांना जाते. मात्र याच भुयारी मार्गात वेड्याने ठाण मांंडल्याने विद्यार्थ्यांना तेथून येणे जाणे मुश्कील झाले आहे. मुळातच भुर्इंज येथील या विद्यालयात जाण्या येण्यात विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणी आहेत. त्यावर मात करून विद्यार्थी ज्ञानग्रहण करत आहेत. महामार्ग ओलांडणे ही समस्या असून, उड्डाणपुलाचे काम अद्याप सुरू नाही. चौपदरीकरणाच्या वेळीच उड्डाणपूल होणार होता; पण त्यात खोडा घातला. ग्रामपंचायतीने उपाययोजना करावी...वेडी व्यक्ती ही मानसिक रुग्ण असते. त्यांच्याकडून होणारे चाळे हे ते मुद्दाम करत नाहीत. हे खरे असले तरी सार्वजनिक ठिकाणी व विशेषत: करुन शालेय ठिकाणी त्यांचा असणारा वावर विद्यार्थ्यांच्या मनात भीती निर्माण करणारा आहे. त्यामुळे या मानसिक रुग्णांना उपचार देण्यासाठी ग्रामपंचायतीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी, हिंदुस्थानी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल भोसले, युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुधीर भोसले-पाटील, तसेच आनंद जाधवराव, बाल सम्राट मंडळाचे अध्यक्ष गणेश जाधव यांनी केली आहे.
भुर्इंजमध्ये भरली येड्यांची जत्रा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2015 21:23 IST