सणबूर : गेले दोन दिवस ढेबेवाडी परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विभागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे़ बनपुरी येथील वांग नदीवरील फरशी पूल दोन दिवसांपासून पाण्याखाली असल्याने वाहतूक ठप्प होऊन दळणवळणाचा बिकट प्रश्न उभा राहिला आहे़ तसेच येथील विद्यार्थी दोन दिवसांपासून शाळेत जाऊ शकले नाहीत़ वांग-मराठवाडी धरणात गतीने पाणी साठ्यात वाढ झाल्याने मेंढ येथील जोेतिबा मंदिर पाण्यात गेले आहे़ अनेक ठिकाणी झाडे पडल्याने विद्युतपुरवठा खंडित झाला आहे़ बनपुरी फरशी पूल सतत चर्चेचा विषय बनत आहे़ शंभूराज देसाई व पाटणकरांनी या पुलाचे भूमिपूजन केले़ मात्र हा पूल श्रेयवादात अडकलेला दिसत आहे़ पावसाळा आला की, या पूलचा प्रश्न उपस्थित होतो़ मात्र अशा वेळी कोणताही नेता या ठिकाणी येऊन येथील लोकांचे काय हाल होत आहेत, हे बघायलाही येत नाही़ निवडणुका आल्या की पुन्हा हाच पुलाचा प्रश्न निघतो़ मात्र, प्रत्यक्षात कार्यवाही होताना दिसत नाही़ या पुलावरून काही वर्षांपूर्वी शाळकरी मुले व व्यक्ती वाहून गेल्याचे प्रकारही घडलेले आहेत; मात्र याकडे अद्याप कोणीच लक्ष दिलेले नाही़ हा पूल बनपुरी गावच्या लोकांचा जीवन मरणाचा प्रश्न आहे़ मात्र गावातील पुढारीही आपल्या नेत्यांना ठणकावून सांगत नाहीत, त्यामुळे या पुलाचे भिजत घोंगडे पडले आहे़ कामाचे श्रेय कोणीही घ्या; पण येथील ग्रामस्थांची धावपळ होऊ देऊ नये. (वार्ताहर)
बनपुरी पूल श्रेयवादात अडकला
By admin | Updated: July 24, 2014 22:09 IST