सातारा : महाबळेश्वर येथील पिण्याच्या पाण्याच्या योजनेत ठेकेदार व अधिकारी यांच्या संगनमताने निकृष्ट व हलक्या प्रतीचे साहित्य वापरल्याने जलवाहिन्यांना जागोजागी गळत्या लागल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, असा आरोप करत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने सोमवारी येथील जीवन प्राधिकरणच्या कार्यालयावर हल्लाबोल केला. प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता विजय मेंगे यांना घेराव घालून आरपीआय कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. मतकर कॉलनी झोपडपट्टी येथील पाणी पुरवठा योजनेतून १0 ते १२ दिवसांतून एकदा पाणी सुटले जाते. संतप्त नागरिक व आरपीआय कार्यकर्ते जेव्हा जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या दालनात आले, त्यावेळी फक्त विजय मेंगे एकटेच होते. तेच या सर्वांच्या प्रश्नांना उत्तरे देत होते. इतर अधिकारी मात्र केबीन सोडून बाहेर निघून गेले. या समस्येचे सोयीसूतक इतर अधिकाऱ्यांना नसल्याचे यातून पाहायला मिळाले. कार्यकर्त्यांनी यानंतर प्राधिकरणासमोर निदर्शने केली. आंदोलनात नवनाथ शिंदे, अजिंक्य तपासे, सचिन वायदंडे, आशिष पोळ, मनोज शिंदे, रवींद्र बाबर, अतुल यादव, तुषार बडेकर, स्वप्नील तपासे, शंकर तोडकर व इतर सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
आरपीआयचा पाण्यासाठी हल्लाबोल
By admin | Updated: December 9, 2014 00:34 IST