अंगापूर : शेकडो वर्षांची परंपरा असणारा सातारा तालुक्यातील अंगापूरचा गणेशोत्सव म्हणजेच भद्रोत्सव यंदाही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ धार्मिक विधी करून उत्सव साजरा केला जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन व ग्रामस्थांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेकडो वर्षांची परंपरा सलग दुसऱ्या वर्षी खंडित होणार आहे.
या बैठकीमध्ये कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भद्रोत्सव अत्यंत साध्या पध्दतीने व मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक हंकारे यांनी केले. त्यास ग्राम प्रशासन व ग्रामस्थांनी प्रतिसाद देत धार्मिक विधीवगळता सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. भाद्रपद प्रतिपदा ते भाद्रपद पंचमी या दरम्यान हा उत्सव साजरा केला जातो.
या बैठकीस सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत देव, अंगापूर वंदनच्या सरपंच वर्षा कणसे, उपसरपंच हणमंत कणसे, अंगापूर तर्फच्या सरपंच मनीषा शेडगे, उपसरपंच विशाखा शेडगे, पोलीसपाटील संतोष गवळी, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र नलवडे, हणमंत सुतार, नवनाथ गायकवाड, माजी उपसरपंच किरण येवले, पोलीस नाईक मिथुन मोरे, महादेव घोरपडे आदी उपस्थित होते.
(चौकट)
पोलीस प्रशासन व ग्रामस्थांच्या बैठकीतील निर्णय
- भद्रोत्सव काळात मंदिरात मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी केले जातील
- परगावात, जिल्ह्यात राहणाऱ्यांनी उत्सवासाठी येऊ नये.
- दोरेकऱ्यांना प्रदक्षिणा घालण्यास बंदी
- देवालयातील नवस, ओटी कार्यक्रमास बंदी
- हार, नारळ, धूप, मिठाई तसेच अन्य दुकाने लावण्यास बंदी
- भाविकांना दर्शनासाठी अथवा नैवद्य घेऊन येण्यासाठी बंदी
- भद्रोत्सव कालावधीत या सूचनांचे कोटेकोर पालन करावे.