कऱ्हाड : सुपारी घेऊन मयूर गोरे या युवकाचा खून करणाऱ्या सहा सुपारी किलरवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. या कारवाईबाबत पुणे येथील विशेष न्यायालयात पोलिसांकडून कागदपत्रांची पूर्तताही करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी दिली. दीपक भीमराव पाटील (वय ३०, रा. आरळे, ता. पन्हाळा), वैभव रमेश माने (२५, गुरुवार पेठ, कऱ्हाड), श्रीयाल ऊर्फ गोट्या भीमराव धेंडे (२३, रा. वानलेसवाडी, ता. मिरज), अनिल तानाजी माळी (२०, रा. कालेटेक, ता. कऱ्हाड) सागर खुबू पवार (२३, रा. इस्लामपूर, लमाणतांडा नं. २) यांच्यासह अन्य एकावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. जखीणवाडी येथील पाणंद रस्त्यावर दि. ९ जून रोजी दुपारी मयूर गोरे या युवकाचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. गुन्ह्यात आरोपींनी पिस्तूलसह कोयता, खोरे व दगड, आदी शस्त्रांचा वापर केला होता. या प्रकरणात सुरुवातीला वैभव माने या आरोपीचे नाव निष्पन्न झाले. वैभवच्या नात्यातील एका महिलेशी मयूरचे मैत्रीचे संबंध होते. हे संबंध भविष्यात आपल्यासाठी बदनामीकारक ठरू शकतात, या भीतीमुळे वैभवने दीपक पाटीलला मयूरच्या खुनाची तीन लाखांची सुपारी दिली. ही सुपारी घेतल्यानंतर दीपक पाटीलने श्रीयाल ऊर्फ गोट्या, अनिल माळी, सागर पवार यांच्यासह अन्य एका साथीदाराच्या मदतीने मयूरचा निर्घृण खून केला. या प्रकरणात पोलिसांनी दीपक पाटीलसह पाचजणांना आतापर्यंत अटक केली आहे. तर सहावा आरोपी अद्याप फरार आहे. या टोळीवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) या कायद्यानुसार कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा पोलिसांकडून विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांनी संबंधित सहा आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई केली असून, पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
सहा ‘सुपारीकिलर’वर ‘मोक्का’ची कारवाई
By admin | Updated: September 13, 2014 00:01 IST