कोरेगाव : भूविकास बँकेचे कर्ज भरलेल्या सातारा तालुक्यातील निगडी आणि वर्णे येथील अनुक्रमे श्रीकृष्ण व काळभैरव पाणीपुरवठा संस्थेच्या ६४७ शेतकरी सभासदांनी कर्ज भरले असल्याने त्यांचा सातबारा उतारा तातडीने कोरा करण्यासाठी तहसीलदार व तलाठ्यांना आदेश देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळातील मुख्य प्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष बैठकीत घेण्यात आला. सलग दहा वर्षे या विषयावर लढा दिला आणि शासनाला निर्णय घेण्यास भाग पाडले असल्याने शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सातारा येथील शासकीय विश्रामगृहामध्ये निगडी व वर्णे येथील शेतकरी सभासदांची बैठक आ. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) डॉ. महेश कदम, बँकेचे व्यवस्थापक सोनावणे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. आ. शिंदे यांनी सर्वप्रथम या शेतकऱ्यांनी कर्जे भरली आहेत, त्यांचे सातबारा कोरा करण्याबाबत तातडीने संबंधित यंत्रणांना आदेश द्यावेत, असे निर्देश डॉ. कदम यांना दिले. शिंदे म्हणाले, ‘जावळीतून आमदार असताना त्या तालुक्यातील पाणी योजनांबाबत प्रयत्न केले. शासनाच्या निदर्शनास या बाबी आणून दिल्यानंतर शासनाने मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन एकरकमी परतफेड योजनेचा अध्यादेश काढले आणि त्याचा लाभ शेतकरी सभासदांना झाला. या योजनेला मुदतवाढ देखील देण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या दृष्टीने आनंदाची बाब होती. या योजनेअंतर्गत निगडी येथील श्रीकृष्ण पाणीपुरवठा संस्थेच्या ५३७ सभासद शेतकऱ्यांनी १ कोटी ८६ लाख ३७ हजारांचे कर्ज घेतले होते. बँकेने ३३१ सभासदांकडून शंभर टक्के कर्जवसुली करत २ कोटी ४७ लाख ३९ हजार रुपये वसूल केले आहे, तर वर्णे येथील काळभैरव पाणीपुरवठा संस्थेच्या ६७३ सभासदांनी ३ कोटी ४७ लाख रुपये कर्ज घेतले होते. बँकेने ३१६ सभासदांकडून शंभर टक्के कर्जवसुली करत ३ कोटी ९६ लाख ७४ हजार रुपये वसूल केले आहेत. त्यांचे सातबारा उतारे कोरे होण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांनी तहसीलदार व तलाठ्यांना आदेश द्यावेत,’ अशा सूचना आ. शिंदे यांनी बैठकीत दिल्या. उर्वरित शेतकऱ्यांबाबत शासनाने तातडीने पावले उचलून निर्णय घ्यावा, यासाठी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार असून, चर्चा करणार आहे. त्यांनी सकारात्मक निर्णय न घेतल्यास हिवाळी अधिवेशनामध्ये आवाज उठविणार असल्याचे आ. शिंदे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)केवळ मुद्दल रक्कम घेण्याबाबत प्रयत्न ‘भूविकास बँकेचे कर्ज थकित झाल्याने शेतकऱ्यांच्या जमिनीवर शासनाने बोजे चढविले आहेत. वाढते व्याज आणि व्याज मुद्दलीकरण, या विषयावर शासनाकडे सातत्याने लढा दिला. या विषयावर संबंधित मंत्र्यांकडे विशेष बैठका घेतल्या आणि एकरकमी परतफेड योजनेबाबत अध्यादेश काढण्यास शासनाला भाग पाडले. सलग दहा वर्षे या विषयावर मी काम करत आहे. आगामी काळात शेतकऱ्यांकडून केवळ मुद्दल वसूल केले जावे, यासाठी प्रयत्न करणार असून, हिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करणार आहे,’ असे आ. शशिकांत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
६४७ शेतकऱ्यांचा सातबारा होणार कोरा
By admin | Updated: November 8, 2015 23:39 IST