सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस झाल्याने प्रमुख सहा धरणांमध्ये १४५.३१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तरीही यंदा ही धरणे भरण्यास उशीर लागला आहे. दरम्यान, उरमोडी वगळता इतर प्रमुख पाच धरणांमध्ये ९५ टक्क्यांच्यावर पाणीसाठा झाला आहे. गतवर्षीपेक्षा या धरणांमध्ये ३.६० टीएमसी पाणीसाठा कमी आहे.
जिल्ह्यात मागील दोन वर्षे चांगला पाऊस झाला. यामुळे सर्व धरणे ऑगस्ट महिन्यातच ओव्हरफ्लो झाली तसेच त्यातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी अनेकवेळा धरणांतून पाणी सोडावे लागल्याने नदीकाठच्या गावांना धोकाही निर्माण झाला. दोन वर्षांपूर्वी तर कोयना, कृष्णा, वेण्णा, नीरा या नद्या पात्र सोडून वाहत होत्या. आताही पावसाळा सुरू होऊन तीन महिने होऊन गेले आहेत.
यावर्षी जून महिन्याच्या उत्तरार्धात जिल्ह्यात चांगला पाऊस झाला होता. मात्र, त्यानंतर तीन आठवडे पावसाची उघडीप होती. पण, जुलै महिन्याच्या मध्यावर पावसाने जोरदार हजेरी लावली. पश्चिम भागात तर तीन दिवस धुवाँधार पाऊस कोसळत होता. यामुळे शेती, पिके, रस्ते, घरे यांचे मोठे नुकसान झाले. तसेच या अतिवृष्टीमुळे प्रमुख धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. कोयनासारख्या धरणात तर एका दिवसात १६ टीएमसीवर पाणी आले. तसेच इतर धरणांमध्येही पाणीसाठा वाढला. त्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरू करावा लागला. त्यानंतर जवळपास एक महिना पावसाची उघडीप होती. त्यामुळे धरणे भरणार का? अशी चिंता होती. पण, सप्टेंबर महिन्यात पाऊस झाला. यामुळे उशिरा का असेना धरणे भरत आली आहेत.
जिल्ह्यातील धोम, कण्हेर, कोयना, बलकवडी, उरमोडी, तारळी या सहा प्रमुख धरणांची पाणी साठवण क्षमता १४८.७४ टीएमसी इतकी आहे. गेल्यावर्षी यावेळी या धरणांमध्ये १४८.९१ टीएमसी पाणीसाठा होता, तर सध्या १४५.३१ टीएमसी इतका आहे. गतवर्षीपेक्षा कमी पाणीसाठा असला तरी धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्गही झाला होता. त्यामुळे सध्याची स्थिती निर्माण झालेली आहे. तरीही धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यामुळे वर्षभराची चिंता नक्कीच संपली आहे.