राहुल तांबोळी -- भुर्इंज---गावातील लोकांना जगातील घडामोडींचे ज्ञान असले पाहिजे, विद्यार्थ्यांचे सामान्यज्ञान वाढून ते स्पर्धेत अग्रभागी असले पाहिजेत, या हेतूने जांब, ता. वाई येथील अशोक शिंदे ऊर्फ लालानाना हा युवक दररोज पहाटे १२ किलोमीटर प्रवास करून गावात वर्तमानपत्र, मासिके पोहोचवितो. विशेष बाब म्हणजे ही सारी धडपड विनामोबदला असून, ज्या किमतीत त्यांना वर्तमानपत्र मिळते, त्याच किमतीत ती लोकांपर्यंत पोहोचवली जातात. कसलेही कमिशन मिळण्याची अपेक्षा नाही.जांब हे गाव भुर्इंजपासून सहा किलोमीटरवर आहे. या गावात वर्तमानपत्र पोहोचत नाहीत. पूर्वी एक व्यक्ती गावात येऊन वर्तमानपत्र वाटत असे; मात्र अधिकृत किमतीपेक्षा तो प्रत्येक वर्तमानपत्रामागे एक रुपया जादा घेत असे. लोकांची ही अडवणूक न पटल्याने नाना शिंदे यांनी स्वत:च लोकांपर्यंत वर्तमानपत्र पोहोचविण्याचा निर्णय घेतला.घरची परिस्थिती चांगली असल्याने त्यांनी या कामात कमिशन अथवा इतर कोणत्या मोबदल्याची अपेक्षा न ठेवता गेली वर्षभर ही अनोखी सेवा चालवली आहे. दररोज पहाटे पावणेसहा वाजता ते स्वत:ची चारचाकी गाडी घेऊन भुर्इंजला येतात. तेथून सुमारे ९० वर्तमानपत्रे घेऊन पुन्हा जांबला जाऊन ती लोकांसाठी उपलब्ध करतात. दररोज पहाटे १२ किलोमीटरचा प्रवास म्हणजे लोकांना ज्ञानप्रकाशाची वाट दाखवणारी अनोखी धडपड आहे. त्यांच्या या धडपडीचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त तानाजीराव शिंदे, किसन वीर कारखान्याचे संचालक पै. मधुकर शिंदे, चिलाइदेवी ट्रस्टचे अध्यक्ष किशोर सणस व ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. ना स्वार्थ... ना अपेक्षा ! अशोक शिंदे ऊर्फ लालानाना हे संपन्न घरातील आहेत. वास्तविक अनेकजण फक्त स्वत:पुरता विचार करतात; मात्र लालानाना त्याला अपवाद असून, ज्या किमतीत त्यांना वर्तमानपत्र मिळतात, त्याच किमतीत ते आम्हाला उपलब्ध करतात. विशेष म्हणजे, या कामासाठी त्यांना दररोज त्यांच्या स्वत:च्या चारचाकीतून १२ किलोमीटर प्रवास करावा लागतो. ही सेवा ते विनामोबदला आणि विनास्वार्थ करत आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्या पत्नीचा अवघ्या एक आकडी मताने पराभव झाला. मात्र तरीही नाराज न होता निकालाच्या दुसऱ्या दिवशीही त्यांनी वर्तमानपत्र जाऊन आणलीच. एक वर्तमानपत्र किमान दहा लोक वाचतात. याचाच अर्थ ते ही सेवा एक हजार लोकांना देत असून, आम्हाला जगाशी संपर्कात ठेवण्याचे काम ते करत आहेत, अशी माहिती संजय शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. आमच्या गावचे तानाजीराव शिंदे आज सनदी अधिकारी म्हणून पिंंपरी चिंचवड महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. सनदी अधिकारी व्हायचं तर सामान्य ज्ञानदेखील अत्यंत आवश्यक आहे, हे मला त्यांच्याकडूनच समजलं. आणि सामान्यज्ञान वाढण्यासाठी दररोज विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्र वाचलं पाहिजे. त्यामुळेच मी कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता ग्रामस्थ व विशेषत: त्यांच्या घरातील विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्र वाचावीत, त्यांच्यातून अनेक तानाजीराव शिंदे यांच्यासारखे उच्चपदस्थ अधिकारी घडावेत, या हेतूने ती उपलब्ध करून देत आहे. - अशोक शिंदे ऊर्फ लालानाना
ज्ञानप्रकाशाची वाट दाखविण्यासाठी रोज १२ किलोमीटर प्रवास
By admin | Updated: November 23, 2015 00:03 IST