लाेकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सरत्या वर्षाला निरोप देताना व नववर्षाच्या स्वागताला ग्राहकांच्या खिशाला मात्र, दरवाढीची झळ बसली आहे. कडधान्यांसह तांदळाच्या दरातील गेल्या आठवड्यात सुरू झालेली दरवाढ अद्यापही कायम आहे. या आठवड्यातही सरासरी १० ते २५ रुपयांनी त्यात वाढ झाल्याने दरवाढीचा फटका ग्राहकांना सहन करावा लागत आहे.
अनेकांच्या घरांमध्ये नवीन वर्षात धान्याची खरेदी केली जाते. मात्र, यंदा त्यास अडचणी आल्या आहेत. गहू, बाजरीस मागणी आहे. खाद्यतेलाच्या दरात महिनाभरापासून आठवड्याला २५ रुपयांची वाढ कायम आहे तरीही त्यास चांगली मागणी आहे.
भाजीपाल्याची आवक कायम आहे. या आठवडा बाजारात पालेभाज्यांची चांगलीच आवक झाली तरीही मेथीच्या दरात वाढ दिसून आली. कोथंबिरीची आवकही समाधानकारक असून दर कायम आहेत. दोडका, वांगी, भोपळा, दोडका, गवारीच्या दरात आठवड्याच्या सुरुवातीला थोडी वाढ झाली होती आता दर पुन्हा स्थिर झाले आहेत. ताज्या भाज्यांची आवक वाढली असली तरी दरही कमी असल्याने ग्राहकांकडून त्यास प्रतिसाद मिळत आहे.
चौकट
खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीमुळे अगोदरच अडचणी वाढलेल्या कुटुंबात आता किराणा मालाच्या दरात वाढ झाली आहे. पंधरवड्यापूर्वी वाजवी दरात उपलब्ध असलेला चांगल्या प्रतीच्या तांदळाचा दर आता सरासरी ४० ते ४५ रुपयांवर जावून पोहोचला आहे तर हरभरा, मसूर, मूगडाळीच्या दरात वाढ झाली आहे.