डॉ. दिलीप पटवर्धन (एमएस, ऑप्थामॉलॉजी)
कोनावर लस निघाली; पण भीतीवर अद्याप अैाषध सापडलेले नाही. सध्यातरी प्रतिकारशक्ती वाढविणे हाच एकमेव उपाय आहे. मास्क वापरणे, हात धुणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे हा महत्त्वाचा मार्ग आहे.
जीवनसत्वांनी युक्त चौरस आहार कोरोनाच्या संकटकाळात महत्त्वाचा ठरला आहे. क आणि ड जीवनसत्वांची पोषणमूल्ये विषाणूच्या संसर्गापासून वाचवतात. त्याशिवाय सात ते नऊ तासांची शांत झोपही अत्यंत महत्त्वाची. टिव्ही किंवा मोबाइलच्या काचेवर डोळे टिकवून रात्र-रात्र जागरणाने प्रकृतीचे होणारे मातेरे कोरोनाच्या संसर्गाकडे घेऊन जाते. रोज नित्यनेमाने व्यायाम, योगा यामुळे शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती मिळते. एक लक्षात ठेवले पाहिजे की, सर्वात अगोदर माणसाचे मन आजाराला बळी पडते, त्यानंतर शरीरात विकाराचा शिरकाव होतो. त्यामुळे सुंदर मनाची माणसे सहसा आजारी पडत नाहीत, हे लक्षात घ्या. खुंटलेल्या मनाची आणि बुरसटलेल्या विचारांची माणसे कोरोनाला प्रोत्साहन देतात, त्यामुळे मन आनंदी ठेवा. सकारात्मक व सहकारात्मक विचारसरणीचा अंगिकार करा. याच विषयावर डॉ. एलिझाबेथ ब्लॅक बर्न या पाश्चिमात्य महिलेने २००९ मध्ये प्रबंध सादर करून नोबेल पारितोषिक मिळविले आहे. सकारात्मक व आनंदी मनामुळे टेलो मियरची लांबी वाढून ते जनुकांचे रक्षण करतात, त्यातून रोग प्रतिकारकशक्ती वाढते, हे सिद्ध केले आहे.
कोरोनाबाधितांचे आणि मृत्यूचे दररोजचे आकडे निराशेला वाव देतात. मानसिक खच्चीकरण करतात. त्यामुळेही मानसिक दौर्बल्य येऊन लोक कोरोनाचे शिकार ठरतात. जगभरात दहा टक्के लोकसंख्येला नैराश्याने ग्रासले आहे, त्यात आपला समावेश होऊ नये, याची काळजी घेऊ या. वास्तविक क्षयरोग अधिक भयानक व जास्त संसर्गजन्य रोग आहे. क्षयाने भारतात दररोज १२०० हून अधिक लोक मरण पावतात; पण त्यापेक्षा कोरोनाचीच भीती समाजमनाला ग्रासून टाकत आहे. फुप्फुसातील रिॲक्शनने मृत्यू ओढवतो, त्यामुळे श्वसनाचे व्यायाम महत्त्वाचे आहेत. ओणवे होऊन श्वास घेणे, वाफ घेणे हे सुद्धा सोपे उपाय आहेत. त्याशिवाय लस घेणे हादेखील उपाय आहे.
(लेखक सांगलीतील प्रख्यात नेत्रतज्ज्ञ व जीवनविद्या मिशनचे अभ्यासक आहेत.)