अशोक पाटील- इस्लामपूर -इस्लामपूर व शिराळा विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे पडघम वाजत असले तरी, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्याविरोधात महायुतीचा उमेदवार कोण, यावर अद्यापही निर्णय नाही. तरीही जयंत पाटील यांच्या इशाऱ्यावर महायुतीतीलच काहीजण बंडखोरीची भाषा करत आहेत. त्यामुळे या मतदार संघातील हवा सध्या तरी नरम आहे. याउलट शिराळा मतदारसंघात काँग्रेस आघाडीचा उमेदवार निश्चित नाही. महायुतीतून शिवाजीराव नाईक यांनी अगोदरच फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे या मतदारसंघात गरम हवा वाहत आहे.इस्लामपुरात विरोधी गटातून नानासाहेब महाडिक यांनी चाचपणी सुरू केली असली तरी, ‘मातोश्री’वर झालेल्या चर्चेतून अद्याप काहीही निष्पन्न झालेले नाही. येणाऱ्या काही दिवसात शिवसेनेतच प्रवेश करून जयंत पाटील यांना आव्हान उभे करण्याचा दावा महाडिक गटातून केला जात आहे. शिराळा मतदारसंघात मात्र चांदोली धरणावरून वाहत असलेली थंड हवा इस्लामपूरकडे सरकताना गरम होत चालली आहे. सत्यजित देशमुख काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असल्याची भाषा करीत विधानसभेत जाण्याच्या तयारीला लागल्याने मानसिंगराव नाईक गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीतून मानसिंगराव नाईक यांची उमेदवारी निश्चित असल्याचे सांगण्यात येत असले तरी, वरिष्ठ पातळीवरुन आघाडीचा धर्म पाळण्याबाबत नेत्यांत एकमत नसल्याचे दिसते. याचा फायदा शिवाजीराव नाईक उठविण्याच्या तयारीला लागले आहेत. परंतु त्यांना राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपची उमेदवारी हवी आहे, अशी चर्चा त्यांच्या कार्यकर्त्यांतून असल्याने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला असल्याचे समजते.एकीकडे या दोन्ही मतदारसंघात मोदी लाट शमलेली नाही, असे चित्र आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते मात्र विरोधी गटातील नेते ‘मॅनेज’ करण्याच्या तयारीला लागले आहेत.एकमत आहे कुठे? महाडिक यांनी इस्लामपूर मतदारसंघातील हवा गरम केली असली तरी, महायुतीत असलेल्या घटकपक्षातील नेते बंडखोरी करण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात जयंत पाटील यांच्याविरोधात हवा असली तरी, महायुतीत मात्र एकमत नसल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.
महायुतीतील मोहऱ्यांचे जयंतरावांच्या तालावर बंडखोरीचे इशारेच इशारे!
By admin | Updated: September 15, 2014 00:07 IST