माडग्याळ : जत पूर्व भागातील उटगी ग्रामपंचायतीची निवडणूक चुरशीने होणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. भाजप व काँग्रेसमध्ये मुख्य लडत असून नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. उटगी ग्रामपंचायतीवर तालुक्यातील काँग्रेस व भाजपच्या नेत्यांची विशेष लक्ष आहे. त्यात कोण बाजी मारणार हे १८ जानेवारीला समजणार आहे.
उटगी येथे भाजपचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व जत पंचायत समितीचे माजी सभापती बसवराज बिरादार व काँग्रेसचे भिमराय बिरादार या दोन नेत्यांचे गट निवडणुकीत एकमेकांसमोर उभे आहेत. भाजपमध्ये काही नाराज अपक्ष म्हणून ऩिवडणुकीत उतरण्याची तयारी केली असली तरी त्यांना बसवराज बिरादार शांत करण्यात य़शस्वी होतात.
उटगीत गेल्या दहा वर्षांपासून भिमराय बिरादार यांची एकहाती सत्ता आहे, तर १० वर्षांपूर्वी भाजपचे बसवराज बिरादार यांनी २० वर्षे ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता ठेवली होती. काँग्रेसचे भिमराय बिरादार यांनी २० वर्षे बसवराज बिरादार यांच्या विरोधात लढून सत्ता न मिळाल्याने २०१० मध्ये बसवराज बिरादार यांनी भिमराय बिरादार यांना आपल्या गटात घेऊन सरपंच पदाची माळ त्यांच्या गऴ्यात घातली. मात्र, २०१५ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भिमराय बिरादार यांनी बसवराज बिरादार यांना पुन्हा विरोध करून एकहात्ती सत्ता मिळविली. दरम्यानच्या काळात स्थानिक सोसायटीच्या निवडणुकीत बसवराज बिरादार यांच्या पॅनेलला बहुमत मिळाले.
चाैकट
भावकी अन् पै-पाहुण्यांचे राजकारण
आता ग्रामपंचायत निवडणुकीत भिमराय बिरादार यांच्या गटातील काही मंडळी बसवराज बिरादार यांच्या गटात सामील झाले आहेत; तर बसवराज बिरादार गटातील काही नाराज भिमराय बिरादार यांच्या गटातून उमेदवारी मिळवून निवडणुकीत उभे आहेत. येथे भावकी व पै पाहुण्यांचे राजकारण चालणार आहे. इतर समाज आहे; परंतु दोन्ही गटांत विभागले जाऊन त्यांचा प्रभाव कमी दिसृून येतो. यामुळे निवडणूक चुरशीने होणार यात शंका नाही.