लोकमत न्यूज नेटवर्क कडेगाव : टेंभू उपसा सिंचन योजनेचे आवर्तन काही दिवसांपूर्वी सुरू झाले होते. मात्र, पंपामधील तांत्रिक बिघाडामुळे पुन्हा बंद करण्यात आले होते. आता दुरुस्त्या करून योजनेचे आवर्तन शनिवारपासून पूर्ववत सुरू करण्यात आले आहे.
यंदा टेंभू योजना सक्षमपणे व विहित वेळेत सुरू असल्यामुळे ५० हजार हेक्टर लाभक्षेत्राला दिलासा मिळाला आहे. पावसाने ओढ दिल्याने लाभक्षेत्रातील पिके कोमेजून गेली होती. योजनेचे आवर्तन सुरू करा, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. यामुळे अधिकाऱ्यांनी मागील काही दिवसांपूर्वीच आवर्तन सुरू केले होते. परंतु तांत्रिक बिघाडामुळे बंद झालेले आवर्तन दुरुस्त्या झाल्यानंतर पुन्हा सुरू झाले. यातून प्रारंभी सांगोला, आटपाडी, कवठेमहांकाळ व त्यानंतर खानापूर आणि कडेगाव तालुक्यातील शेतीपिकांना पाणी दिले जाणार आहे.
योजनेच्या लाभक्षेत्रात मोठ्या प्रमाणात ऊसक्षेत्र आहे. शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून साखर कारखाने योजनेची पाणीपट्टी वसूल करून घेतात. ही रक्कम कारखान्यांनी तत्काळ योजनेकडे भरली तर ती अखंडित चालू राहते, अन्यथा वीजबिल थकबाकीमुळे महावितरणकडून योजनेचा वीजपुरवठा खंडित होतो आणि योजनेचे आवर्तन लांबणीवर पडते. हा पूर्वानुभव लक्षात घेता अधिकाऱ्यांनी यावर्षी पाणीपट्टी वसुलीचे नियोजन योग्यरीत्या केले आहे. सद्य:स्थितीत ऊसबिलातून वसूल झालेली १३ कोटींची पाणीपट्टी कारखान्यांकडून यायची आहे. परंतु कारखान्यांनी ती तत्काळ भरण्याची जबाबदारी घेतली आहे.
चौकट
ताकारी योजना कधी सुरू करणार?
कडेगाव, पलूस, खानापूर, तासगाव तालुक्यात अद्यापही पुरेसा पाऊस झाला नाही. यामुळे शेतीपिकांना पुरेसे पाणी मिळालेले नाही. पाण्याअभावी पिके कोमेजू लागली आहेत. यावर उपाय म्हणून ताकारी योजना सुरू करण्याची गरज आहे. टेंभू योजना सुरू झाली, पण ताकारी कधी सुरू करणार, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.