सांगली : चार दिवसांनंतर महापालिका प्रशासनाने तत्काळ पाणीपुरवठा सुरू केला आहे. मात्र, गढूळ पाणीपुरवठा झाल्याने सांगलीकरांना वॉटर एटीएमवरच अवलंबून राहावे लागत आहे. अद्यापही काही उपनगरात पाणीपुरवठा पूर्ववत होऊ शकलेला नाही.
महापुरात जॅकवेलमध्ये पाणी आल्याने, महापालिकेने महावितरणला वीजपुरवठा खंडित करायला लावला होता. यामुळे शहरात चार दिवसांपासून पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. या काळात सांगलीकरांनी वॉटर एटीएमच्या पाण्यावर तहान भागविली. टँकरनेही काही भागांत पाणी द्यावे लागले. महापुराचे पाणी ओसरू लागताच, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पुराच्या पाण्यात उतरून जॅकवेल पाणीपुरवठा सुरू केला. यामुळे मंगळवारपासून काही भागांत पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. मात्र, उपनगरात कमी दाबाने, अपुरा पाणीपुरवठा होत आहे. महापुरात जलवाहिन्या चिखलात अडकल्याने शहरात मंगळवारी गढूळ व दूषित पाणीपुरवठा झाला. महापालिकेने सुरुवातीला काही दिवस मिळणारे पाणी पिण्यासाठी न वापराता, अन्य कारणासाठी वापरावे, नंतर पाणी उकळून प्यावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.