ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 27 - रस्त्याकडेला थांबलेल्या उसाच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीवर मागील बाजूनं भरधाव आलेली कार आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. अंकली-मिरज रस्त्यावरील धामणी फाट्याजवळ सोमवारी मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
मृतांमध्ये मोटारीचा चालक दीपक जाधव, नंदकुमार चव्हाण व उदय पाटील यांचा समावेश आहे. जखमी झालेल्या उदय कांबळे यांच्यावर मिरजेतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. मिरजेजवळ धामणी फाट्यावर उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली रस्त्याकडेला उभा करण्यात आली होती.
यादरम्यान, चालक दीपक जाधव भरधाव वेगाने कार चालवत होते. त्यांना उसाची ट्रॉली न दिसल्याने त्यांची गाडी ट्रॉलीवर जाऊन आदळली. या भीषण अपघातात जाधव यांच्या गाडीचा अक्षरशः चुराडा झाला. यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.